राष्ट्रवादीला आघाडी तोडण्याची घाई!

By Admin | Updated: August 13, 2014 02:57 IST2014-08-13T02:57:35+5:302014-08-13T02:57:35+5:30

विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे.

NCP rush to break lead! | राष्ट्रवादीला आघाडी तोडण्याची घाई!

राष्ट्रवादीला आघाडी तोडण्याची घाई!

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाशी कुठलीही चर्चा न करता तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्याआधी त्यांनी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी हे सगळे करण्यात आले आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीच करायची नाही यासाठीचे कारण यानिमित्ताने शोधले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुरुवातीपासून आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्यांचे खंदे समर्थक तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोघांनी स्वबळासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर दबाव वाढविल्याचे म्हटले जाते. त्यातच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीच्या जागा वाढतील, असे सर्वेक्षण समोर येत असल्याने त्यांचा वापरही आपला मुद्दा रेटण्यासाठी करून घेतला जात आहे.
काँग्रेस पक्ष मोहन जोशी यांच्या उमेदवारीवर ठाम राहिला तर आघाडी तोडण्याची धमकी राष्ट्रवादीकडून दिली जाऊ शकते. त्यावर काँग्रेसकडून काय प्रतिसाद येतो, यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल. विधान परिषदेची जागा काँग्रेसची नाही, ती दोघांसाठीही खुली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना सांगितले. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे संयोजक म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या जागेबाबत आम्हाला विश्वासात घेऊन आधी निर्णय
करायला हवा होता, असे सांगून त्यांनी आज निर्माण झालेल्या तिढ्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: NCP rush to break lead!