नवी मुंबई व दिघ्यातील २५ हजार रहिवाशांना दिलासा
By Admin | Updated: July 30, 2016 05:47 IST2016-07-30T05:47:29+5:302016-07-30T05:47:29+5:30
नवी मुंबई येथील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींतून राहणाऱ्या २५ हजार रहिवाशांना राज्य सरकारने शुक्रवारी दिलासा दिला. या इमारतींसह राज्यातील सर्वच अनधिकृत इमारतींबाबत

नवी मुंबई व दिघ्यातील २५ हजार रहिवाशांना दिलासा
मुंबई : नवी मुंबई येथील दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींतून राहणाऱ्या २५ हजार रहिवाशांना राज्य सरकारने शुक्रवारी दिलासा दिला. या इमारतींसह राज्यातील सर्वच अनधिकृत इमारतींबाबत राज्य सरकार नवीन धोरण जाहीर करणार असल्याने तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
संदीप नाईक, अजित पवार, जयंत पाटील वगैरे सदस्यांनी यासंदर्भात लक्षवेधीद्वारे चर्चा उपस्थित केली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात नसल्याने त्यावर उत्तर देणे अशक्य आहे, म्हणून ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. लक्षवेधी पुढे ढकला; पण या अनधिकृत इमारती निष्काशित करण्याच्या कारवाईला देण्यात आलेल्या स्थगितीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. (विशेष प्रतिनिधी)