हिंदू संस्कृतीतून राष्ट्र शक्तिशाली होईल

By Admin | Updated: January 12, 2015 03:55 IST2015-01-12T03:55:16+5:302015-01-12T03:55:16+5:30

हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल.

The nation will become powerful through Hindu culture | हिंदू संस्कृतीतून राष्ट्र शक्तिशाली होईल

हिंदू संस्कृतीतून राष्ट्र शक्तिशाली होईल

औरंगाबाद (छत्रपती संभाजी महाराज नगरी ) : हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल. ‘स्वान्त सुखाय, बहुजन हिताय’ याप्रमाणे काम करावे लागणार आहे. सर्व भेदांना नष्ट करणाऱ्या राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या समाजनिर्मितीचे काम संघाला करावे लागणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी तन, मन, धनाने नि:स्वार्थीपणाने राष्ट्रवैभव प्राप्तीसाठी काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.
संघाची व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदुत्व वाढविण्यासोबत बहुजनांनादेखील सोबत घेण्याचा मंत्र डॉ. भागवत यांनी यावेळी दिला. हजारो वर्षांची भेदपरंपरा संपवून सनातन मूल्यांचा विचारही त्यांनी मांडला. हिंदू संस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा महासंगम रविवारी येथे बीड
बायपास रोडवरील छत्रपती संभाजी महाराज नगरीत पार पडला. देवगिरी प्रांतातील ११ जिल्ह्यांतील ४१ हजार २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या महासंगमात राष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी लागणारी ज्ञानरूपी ऊर्जा मिळवली.
डॉ. भागवत म्हणाले, की या देशाचा पुत्र भारतमातेवर श्रद्धा ठेवणारा, संस्कृतीच्या मूल्यांआधारे जीवन जगणारा, पूर्वजांचा गौरव मनात ठेवणारा हिंदू आहे. येथे पूजेचा प्रश्नच येत नाही. येथे हिंदूंना पूजा बदलण्याच्या निमित्ताने त्याला बाहेर काढून ‘तू चूक, आम्हीच खरे’ या उदात्त विचाराने आपले गेलेले लोक परत आणण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृती म्हणजे पुस्तकातील व्याख्या नाही. संस्कृती जगून दाखविण्याचे काम संघाला सर्व समाजाला घेऊन करावे लागेल. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्यांची मंदिरे, पाणवठे, स्मशानभूमी वेगवेगळ्या आहेत. हे सर्व काही बदलावे लागणार आहे. हे राष्ट्र सार्वभौम आहे. त्यासाठी संघाचे काम वाढत आहे. वाढत जाणार आहे.
विरोधकांना संघ खटाटोप करतो, शक्तिप्रदर्शन करतो, असे वाटत असले तरी संघ असे करतो हे स्वयंसेवकांसह नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे. आजच्या जगरहाटीमध्ये संघाचा
प्रभाव जीवनात आणण्यापलीकडे
मोठे लक्ष्य असल्याचे डॉ़ भागवत म्हणाले़ नियोजनबद्ध आखणीमुळे पाऊण लाख नागरिक असतानाही कुठे गर्दी, गोंधळ झाला नाही. (प्रतिनिधी)

पोळ्यांनी जोडली १५ हजार कुटुंबे

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महासंगम सोहळ्यासाठी ६०० स्वयंसेवकांनी २ लाख पोळ्या संकलन करून शहरातील १५ हजार कुटुंबांना थेट संघाच्या कार्यात सहभागी करून घेतले. ‘पोळी संकलन’ हे प्रभावी माध्यम होऊ शकते, असा संदेश यातून देण्यात आला.
> १०० एकर परिसरात आयोजित महासंगमावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला. या ड्रोनला उच्च दर्जाचा कॅमेरा बसविला होता. याद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. रिमोटच्या साह्याने ड्रोनला सर्वत्र फिरविले जात होते. पोलिसांना एका ठिकाणी बसून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चोहोबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवता आले.

Web Title: The nation will become powerful through Hindu culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.