मुंबईचे नाले गाळात

By Admin | Updated: April 28, 2017 02:48 IST2017-04-28T02:48:11+5:302017-04-28T02:48:11+5:30

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे

Mumbai's gutters | मुंबईचे नाले गाळात

मुंबईचे नाले गाळात

मुंबई : ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे १४ टक्के काम झाले आहे. परंतु मिठी नदीचा प्रवाह असलेल्या पश्चिम उपनगरात अद्याप सफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई झाल्यामुळे नवीन ठेकेदार पुढे येण्यास तयार नव्हते. तसेच गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना विभागस्तरावरील कामगार व बिगर शासकीय संस्थांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभाग पातळीवर मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे १ एप्रिलपासून तर छोट्या नाल्यांची कामे ७ एप्रिलपासून सुरू झाली.
मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कंत्राट गेल्याच आठवड्यात देण्यात आले. त्यानुसार काही ठिकाणी धिम्या गतीने गाळ काढण्यास सुरुवात होत आहे. मात्र आठवड्यानंतरही यात काही फारसा बदल झालेला नाही. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात १३ टक्के, पश्चिम उपनगरात २१, पूर्व उपनगरत १७ असे एकूण १९ टक्के नाल्यांचे काम झाले आहे. एप्रिल महिना संपण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. मात्र अशा संथ कामामुळे नाल्यांमध्ये गाळ पडून असल्याने ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. (प्रतिनिधी)
असा होता नालेसफाईचा घोटाळा -
नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे २०१५मध्ये उजेडात आले. या प्रकरणी स्थापन चौकशी समितीने नालेसफाईच्या कामात अनियमितता, गाळ वाहून नेण्यात घोटाळा आणि गाळ टाकण्यासाठी दिलेल्या कचराभूमीचे ना हरकत प्रमाणपत्रही बोगस असल्याचे आढळून आले. या प्रकरणी १४ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि सात ठेकेदारांवर फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मिठी नदी गाळातच : मिठी नदीने २००५मध्ये मुंबईला मगरमिठीत घेतले होते. त्यामुळे मिठी नदीने पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडली की मुंबईचा जीव मुठीत येतो. हा धोका टाळण्यासाठी मिठी नदीच्या सफाईकडे विशेष लक्ष दरवर्षी देण्यात येते. मात्र या वेळेस मिठी नदीची सफाई संथगतीने सुरू आहे. पश्चिम उपनगरातील मिठी नदीच्या प्रवाहाची सफाईही सुरू झालेली नाही. यामुळे पावसाळ्यात मिठी नदी डोकेदुखीचे कारण ठरणार आहे.

Web Title: Mumbai's gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.