Ambadas Danve, Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यात सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनातील दुससा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गाजला. सभागृहातील विधानसभेत तिसऱ्या दिवशीही सुरुवातीच्या टप्प्यात विरोधक पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. त्यानंतर विधान परिषदेत विरोधकांनी महाराष्ट्राचे संरक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात आवाज उठविला.
सर्वाधिक पोलिसमृत्यू हृदयविकाराने...
"पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला, तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्युटी व प्रवासात जाते. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. आकडेवारीनुसार, सर्वाधिक पोलिसमृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत," अशी धक्कादायक माहिती दानवे यांनी सभागृहात दिली.
"पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली. मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का?" असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारला.
पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर, मुंबईत पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे नूतनीकरण होणार आहे. तसेच डिजी लोनचे प्रलंबित अर्ज निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना दिले.