नाशिकमध्ये मनसेतील बंडाचे वादळ शमले
By Admin | Updated: July 7, 2014 13:54 IST2014-07-07T13:51:42+5:302014-07-07T13:54:04+5:30
पक्षात एकाकी पडल्याने नाराज असलेले आ. वसंत गीते यांचे नाराजीनाट्य राज ठाकरेंच्या भेटीनंतर संपुष्टात आले आहे.

नाशिकमध्ये मनसेतील बंडाचे वादळ शमले
>ऑनलाइन टीम
नाशिक, दि. ७- पक्षात एकाकी पडल्याने नाराज असलेले आ. वसंत गीते यांचे नाराजीनाट्य राज ठाकरेंच्या भेटीनंतर संपुष्टात आले आहे. मी नाराज नसून शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरेंनी बोलवलेल्या अनुपस्थित होतो असे स्पष्टीकरण देत गीतेंनी या नाट्यावर पडदा टाकला.
मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य सुरु होते. पक्षाचे आमदार वसंत गीते यांना पक्षातील निर्णयप्रक्रियेपासून डावलण्यात आले होते. त्यामुळे गीते पक्षनेतृत्वावर नाराज होते. पक्षातील बंडाचे वादळ शमवण्यासाठी अखेर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिकला धाव घेतली. रविवारी राज ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला गीते अनुपस्थित राहिले. त्यामुळे गीते व त्यांचे समर्थक नगरसेवक मनसेला जय महाराष्ट्र करतील अशी चर्चाही रंगली होती. मात्र सोमवारी सकाळी गीतेंनी कोलांटीउडी घेतली
सोमवारी सकाळी मनसेच्या नितीन सरदेसाई आणि दिपक पायगुडे या नेत्यांनी गीतेंची समजूत काढली. यानंतर गीतेंना घेऊन ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरेंशी चर्चा केल्यावर गीतेंची नाराजी दूर झाली व मनसेतील बंडाचे वादळ शमले. मनसे हा माझाच पक्ष असल्याने त्यांच्यावर नाराज नाही असे स्पष्टीकरण गीतेंनी दिले आहे.