लोणी धामणीच्या गारपीटग्रस्तांची ससेहोलपट पंचनाम्याची कागदपत्रे झाली गहाळ
By Admin | Updated: May 8, 2014 22:56 IST2014-05-08T17:52:16+5:302014-05-08T22:56:06+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे

लोणी धामणीच्या गारपीटग्रस्तांची ससेहोलपट पंचनाम्याची कागदपत्रे झाली गहाळ
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक प्रकाराची व त्याला जबाबदार असणार्या अधिकार्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे.
लोणी धामणी परिसरात बहुतेक शेतकर्यांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले. काढणीला आलेली पिके हातातून गेली. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत. या पिकांचे पंचनामे महसूल विभागाने व कृषी विभागाने केले होते. परंतु, भरपाई मिळताना ज्याचे राजकीय वजन जास्त, ज्याची अधिकार्यांबरोबर ओळख जास्त, अशाच शेतकर्यांना भरभरून भरपाई मिळाली आहे. पण खरे नुकसानग्रस्त व गरीब शेतकरी मात्र या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप आहे. तर दुसरीकडे पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांना उपसरपंच अनिल वाळुंज यांच्या प्रयत्नाने १३५ शेतकर्यांना दहा लाख रुपयांची मदत मिळाल्याने तेथील शेतकरी मात्र समाधानी व आनंदी आहेत. खडकवाडी, नाथनगर (ता. आंबेगाव) येथील २१८ शेतकर्यांना २५ लाख ६३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे येथील माजी उपसरपंच अनिल डोके यांनी सांगितले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकर्याना मदत मिळत आहे, तर दुसरीकडे नुकसान होऊनही मदत मिळत नाही, हा कुठला कायदा? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. या अधिकार्यांनी अशी चुकीची कामे केली असतील तर अशा दोन्ही अधिकार्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी; अन्यथा शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा लोणी येथील शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष अशोक आदक पाटील यांनी दिली आहे.
चौकट :
नऊ महिने नऊ दिवस
येथील शेतकरी बारकू लंके हे ग्रामविकास अधिकार्यांकडे नुकसानीची चौकशी करण्याकरिता गेले असता नुकसानभरपाई मिळण्याकरिता नऊ महिने नऊ दिवस भरावे लागतात, असे संतापजनक उत्तर मिळाल्याचे बारकू लंके यांनी डोळ्यांत अश्रू व भावनाविवश होऊन सांगितले.