सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यादरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर टीका करत आहेत. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कुठलंही संकट आलं की केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे," असं म्हणत दानवे यांनी राज्य सरकारला टोला लगावला."कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही. तेव्हा महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहे," असेही दानवे म्हणाले. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थापित करण्यासाठी १६२ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंन्स्टॉलेशनची मंजुरी जानेवारी २०२१ ला दिली होती. मंजूर केलेल्या १६२ प्लांट्समधून अशा १० प्लांट्सच्या इंन्स्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणते ही कठोर पाऊले उचलली नाहीत," असा आरोप त्यांनी केला."जानेवारी २०२१ ला ही मंजुरी दिली असून, या विषयावर युद्ध पातळीवर जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. इतकंच हा नाही, तर या संपूर्ण योजनेचा खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे. त्यासोबत यामध्ये ७ वर्षांसाठी लागणारा देखभाल खर्चदेखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजी पणा व बेजवाबदार पणा यातुन स्पष्टपणे दिसून येतो." असेही दानवे म्हणाले. राज्याच्या मदतीस केंद्र सक्षम"आज केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतींमध्ये महाराष्ट्राला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे," अशी माहिती दानवे यांनी दिली. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील. केंद्र सरकारने दिलेल्या वचनानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा देखील सर्वाधिक वाटा मिळत असल्याचं ते म्हणाले.
संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:55 IST
Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरल्याचा दानवेंचा आरोप
संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरल्याचा दानवेंचा आरोपकेंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतींमध्ये, महाराष्ट्राला मिळणारा वाटा सर्वात मोठा : दानवे