मेट्रो तिकीट महागणार, दरवाढ विरोधातील याचिका फेटाळली
By Admin | Updated: June 24, 2014 18:15 IST2014-06-24T15:36:42+5:302014-06-24T18:15:02+5:30
मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरवाढीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत.

मेट्रो तिकीट महागणार, दरवाढ विरोधातील याचिका फेटाळली
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरवाढीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. मेट्रो तिकीटाचे दर वाढवू नयेत यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र मंगळवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत भाडेवाढीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे रिलायन्सच्या पत्रकानुसार मेट्रोचे किमान भाडे १० रुपये तर कमाल भाडे ४० रुपये इतके असेल. ८ जुलैपासून हे नवे दर लागू होतील.
मेट्रोच्या तिकीट दरावरून ब-याच काळापासून राज्य सरकार व रिलायन्समध्ये वादावादी सुरू होती. मेट्रोचे किमान भाडे ९ रुपये व कमाल भाडे १३ रुपये असा दर सरकारने निश्चित केला होता. मात्र मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे काण पुढे करत हे दर १०,२०,३० व ४० रुपये असे ठेवण्यावर रिलायन्स ठाम होती. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती, सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता नवे दर लागू होतील. ८ जून रोजी मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर रिलायन्सने एका महिन्याभरासाठी तिकीट १० रुपये इतके ठेवले होते, त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी अवघे १० रुपयेच मोजावे लागत होते.
मात्र आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ८ जुलैपासून नवे दर लागू होतील व मेट्रोतून प्रवास करणा-यांच्या खिशालाही कात्री लागणार आहे.