ग्रंथदिंडीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By Admin | Updated: January 16, 2016 03:08 IST2016-01-16T03:08:33+5:302016-01-16T03:08:33+5:30
टाळमृदंग व ढोलताशांचा गजर, वीणेचा झंकार, आसमंत निनादणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा मंगलमय आणि भारलेल्या वातावरणात स्वारस्वतांचा महासोहळा सुरू झाला.

ग्रंथदिंडीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
- हणमंत पाटील/ विश्वास मोरे, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
टाळमृदंग व ढोलताशांचा गजर, वीणेचा झंकार, आसमंत निनादणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा मंगलमय आणि भारलेल्या वातावरणात स्वारस्वतांचा महासोहळा सुरू झाला. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या दिंडी सोहळयात मंगळागौरीचे खेळ आणि तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह होता.
महापालिका भवनापासून दुपारी अडीचला ग्रंथदिडी निघाली. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, बहिणाबार्इंची गाथा, महासाधू मोरया गोसावींचे चरित्र, घटनेची प्रत, सकल संतगाथा, लीळाचरित्र या ग्रंथांचे पूजन करून ते पालखीत ठेवण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी ग्रंथांचे पूजन केले. पूजन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तुतारी वाजली, ढोलताशांचा निनाद झाला. टाळमृदंगासह वीणेच्या झंकारात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा जयघोषात अब्दागिरीसह ग्रंथदिंडीची सुरुवात झाली.
पालखीसमोर विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज, संत गाडगेबाबा, महासाधू मोरया गोसावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. बैलगाडीमध्ये रमेश पाचंगे चौघडा वाजवत होते. आनंदवन ग्रुपच्या महिला मंगळागौरीचे खेळ खेळत होत्या. ज्ञानेश्वर विद्यालय, देहू-आळंदीतील वारकऱ्यांची तसेच आयटी दिंडी लक्षवेधी होती. सोहळ्यातील विजय रेघे, सुरेश गुरव, अतुल गुरव, सुनील गुरव, स्वललिता गुरव यांची गगनभेदी तुतारी लक्ष वेधून घेत होती. ग्रंथदिंडी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली.
संमेलनाध्यक्ष-स्वागताध्यक्षांची फुगडी
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांची फुगडी रंगली. त्याचबरोबर भरत देसडला आणि डॉ. पाटील, डॉ. देखणे आणि पाटील यांच्या फुगडीने सोहळ्यात रंग भरला. त्यानंतर ही वैभवी ग्रंथदिंडी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास संमेलनस्थळी पोहोचली. तेथे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी
खासदार श्रीरंग बारणे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
मंगळागौर, पारंपरिक खेळ रंगले
सुवर्णालंकारांसह नऊवारी साडी परिधान केलेल्या महिला, सलवार-कुर्ता, डोक्यावर फेटा बांधलेल्या महिला, तसेच ‘साहित्यपंढरीचे आम्ही वारकरी’ असे लिहिलेल्या गांधीटोप्या तरुणांनी परिधान केल्या होत्या. मंगळागौर, फुगड्या, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे खेळ लक्षवेधी होते. तुडुंब गर्दी असल्याने काही काळ महामार्गासह विविध चौकांत प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला.
विविध प्रकारच्या दुर्बिणींचे आकर्षण
पिंपरी : हल्लीच्या युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढू लागला आहे. म्हणूनच येथे वैज्ञानिक खेळण्यांचा स्टॉल आहे. येथे दुर्बीण, खगोलशास्त्रीय दुर्बीण आदी उपलब्ध आहेत. आकाशदर्शनासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणीचे विविध प्रकार येथे आहेत.
ई-साहित्याच्या दालनात ४०० पुस्तके
पिंपरी : ई-साहित्य भांडाराच्या दालनात तरुणांसाठी सुमारे चारशे पुस्तके उपलब्ध आहेत. ई-बुक या स्वरुपात असलेली ही पुस्तके विनामूल्य कॉपी करता येऊ शकतात. त्याशिवाय मुलांसाठीच्या साहित्याची विशेष सीडीही उपलब्ध आहे.
साहित्य संमेलनातील वैशिष्ट्ये
भव्य सभामंडप, अत्याधुनिक प्रकाश योजना, सुमारे १२ हजार आसनक्षमतेचा भव्य मंडप साहित्य रसिकांसाठी उभारला आहे. शिवाय उपमंडपातील आसनक्षमता ६ हजार इतकी आहे. मुख्य मंडपात व्यासपीठावर एका बाजूला आचार्य अत्रे यांचे, तर दुसऱ्या बाजूला पु. ल. देशपांडे यांची पुस्तक वाचन करतानाची शिल्पाकृती साकारली आहे. अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या साहित्य रसिकांना साहित्य संमेलनातील चर्चासत्र, अन्य कार्यक्रम पाहता येतील, यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. १२०० चौरस फुटांचा एक भव्य एलईडी स्क्रीन, तसेच संपूर्ण मंडपात एकूण १३ एलईडी स्क्रीन लावले आहेत.
विविध साहित्यपरंपरा, ग्रंथपरंपरा, ज्ञानपरंपरांचा सन्मान या संमेलनात होत आहे. त्यामुळे मराठी सारस्वतविश्व किती श्रीमंत आहे ते दिसून येते. सर्व जाती-धर्म-परंपरा एकजुटीने या संमेलनात सहभागी झाल्या आहेत. संवाद आणि वादाची परंपरा साहित्य संमेलनाला असली, तरी सत्य, सौंदर्य आणि भक्तीचा मिलाफ असणारे हे साहित्य संमेलन आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि महासाधू मोरया गोसावी, क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या भूमीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. - डॉ. पी. डी. पाटील, स्वागताध्यक्ष
‘हे सारस्वताचे गोड! तुम्हींची लाविले जे झाड अवधानामृते वाढ शिंपोनी केली’ असे संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या आळंदीतून मराठीचा आद्य उद्गाराचा पाया आळंदीत रचला गेला; तसेच त्या आद्य उद्गारांचा कळस देहूतील तुकोबारायांनी केला. अशा या भूमीमध्ये वैभवी संमेलन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. - डॉ. रामचंद्र देखणे, संतसाहित्याचे अभ्यासक
साहित्य संमेलनातील वैशिष्ट्ये
भव्य सभामंडप, अत्याधुनिक प्रकाश योजना, सुमारे १२ हजार आसनक्षमतेचा भव्य मंडप साहित्य रसिकांसाठी उभारला आहे. शिवाय उपमंडपातील आसनक्षमता ६ हजार इतकी आहे. मुख्य मंडपात व्यासपीठावर एका बाजूला आचार्य अत्रे यांचे, तर दुसऱ्या बाजूला पु. ल. देशपांडे यांची पुस्तक वाचन करतानाची शिल्पाकृती साकारली आहे. अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या साहित्य रसिकांना साहित्य संमेलनातील चर्चासत्र, अन्य कार्यक्रम पाहता येतील, यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. १२०० चौरस फुटांचा एक भव्य एलईडी स्क्रीन, तसेच संपूर्ण मंडपात एकूण १३ एलईडी स्क्रीन लावले आहेत.