Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 07:01 IST2025-06-21T07:01:12+5:302025-06-21T07:01:59+5:30
Maha Vikas Aghadi: उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंसमोर केली 'स्वतंत्र' लढण्याची मागणी; शरद पवार म्हणतात, एकत्र लढावे अशी आमची इच्छा, पण अद्याप निर्णय नाही.

Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : येत्या काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढाव्या की स्वतंत्र याबद्दल महाविकास आघाडीमध्ये कोणतेही सूर जुळताना सध्या दिसत नाही. एकीकडे, एकत्र लढावे अशी आमची इच्छा असून चर्चा करून
निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी पुण्यात म्हटले आहे. दुसरीकडे उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुख- संपर्कप्रमुखांनी मुंबईत झालेल्या बैठकीत मात्र उद्धव ठाकरेंसमोर 'स्वतंत्र' निवडणुका लढण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे रोजीच्या निकालाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या तयारीसाठी राजकीय पक्षांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवन कार्यालयात घेतली. या बैठकीला राज्यभरातून जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख आले होते. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली. यात या नेत्यांनी आगामी निवडणुका आपण वेगळ्या लढवल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केल्याची माहिती उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली.
गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांशी संपर्क वाढवला असून मंगळवारी प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्यानंतर, बुधवारी माजी नगरसेवकांना बैठकीला बोलावले. गुरुवारी पक्षाचा ५९ वर्धापनदिन कार्यक्रम घेतला तर शुक्रवारी जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुखांची भेट घेतली. बुधवारी ‘मातोश्री’वर बैठकीला गेलेले अजित भंडारी आणि विजेंद्र शिंदे यांनी गुरुवारी शिंदेसेनेत प्रवेश करून ठाकरेंना धक्का दिला.
मनसेसोबत जायचे की नाही, जनतेला विचारणार
बैठकीत मनसेसोबत जायचे की नाही, यावर जनतेची मते घेऊन महिनाभरात आढावा द्या, तसेच विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्याचा मुद्दा उद्धव ठाकरे गांभीर्याने घेतल्याचे दिसते. ही वाढ कशी झाली? त्याची कारणे काय? यांचा आढावा घेऊन बोगस मतदार नोंदणी होऊ देऊ नका, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आमदारांसोबत चर्चा
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. १० दिवसांनी सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात काय मुद्दे मांडायचे यावर चर्चा झाल्याचे कळते.
एकत्र बसून चर्चा करू- शरद पवार
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणाले, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतून लढायच्या की स्वतंत्रपणे उमेदवार द्यायचे, याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आता निवडणुका लांबवता येणार नाहीत. साधारण ३ महिन्यांत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. आमचा प्रयत्न हा राहील की काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), शेकाप आणि इतर छोटे पक्ष असे आम्ही सगळे एकत्र बसू व एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाता येतेय का, याबाबत चर्चा करू. एकत्र निवडणूक लढावी, अशी आमची इच्छा आहे.