महाडिक कुटुंबाचे पवारांकडून सांत्वन

By Admin | Updated: November 25, 2015 03:45 IST2015-11-25T03:45:28+5:302015-11-25T03:45:28+5:30

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची

Mahadik family's Pawar consolation | महाडिक कुटुंबाचे पवारांकडून सांत्वन

महाडिक कुटुंबाचे पवारांकडून सांत्वन

सातारा : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये नोकरी देण्याची, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याची ग्वाही, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी दिली. महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली.
सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे महाडिक यांच्या मूळगावी पवार यांनी मंगळवारी भेट दिली. महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांनी महाडिक कुटुंबीयांशी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. स्वाती महाडिक या उच्चविद्याविभूषित आहेत. एम. एस. डब्ल्यू., बी. एड. असलेल्या स्वाती महाडिक या उधमपूर (काश्मीर) येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होत्या.
सरकारकडून नोकरीसाठी आता कोणते ठिकाण देण्यात येते हे पाहा. ते ठिकाण दूरचे असल्यास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांना नोकरी देण्यात येईल. संस्थेतर्फे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या तीन शाळा चालविल्या जातात. तेथे स्वाती महाडिक यांना काम करता येईल. तसेच कार्तिकी आणि स्वराज या महाडिक यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इस्लामपूर (सांगली) : दीड वर्षांत ऊसदराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेलेले नाही. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी अनुकूल धोरण आखले जात नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जीवनातील हे दिवस बदलण्याची धमक लोकशाहीत आहे, असे सूचक वक्तव्य करीत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना सत्तेवरून पायउतार व्हायला लावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावरील माजी आमदार दिवंगत व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पवार यांच्याहस्ते झाले. पवार म्हणाले की, साखरेचा दर तीन हजार ते एकतीसशे रुपयांपर्यंत जाणे आवश्यक होते. मात्र आज हीच साखर तेवीसशे ते चोवीसशे दराने विकली जात आहे. त्यामुळे मागणी करण्यात येणारा ऊस दर आणि साखरेच्या दरात मोठी तफावत आहे. याचा वास्तववादी विचार व्हायला हवा. कारखानदारी बंद पाडून ठेवण्यापेक्षा साखरेसह वीज आणि इथेनॉल निर्मितीमधून चार पैसे जादा मिळवून शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दर देण्याची भूमिका घ्यायला हवी. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात मर्यादित जमीन, मर्यादित पाणी आणि अधिक साखरेचे प्रमाण असणारे पीक घेतले पाहिजे. (प्रतिनिधी)

Web Title: Mahadik family's Pawar consolation