मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीही किमान पसेंटाइल अर्हतामान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापुढे घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांना लागू होणार असल्याचे 'एमपीएससी'ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
एमपीएससीच्या कार्य नियमावलीतील नियम क्रमांक ८ (vi) मध्ये १३ जानेवारी २०२१ रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीदेखील किमान पर्सटाइल अर्हतामान लागू होईल.
या निर्णयानुसार आता क गटाच्या परीक्षांसाठी किमान पसेंटाइल अर्हतामान लागू होणार आहे. पर्सेटाइल प्रणाली उमेद्वाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवाराने किती टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, हे दर्शवते. एमपीएससी परीक्षेत प्राथमिक व मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेटाइल वापरले जाते.
पसेंटाइल म्हणजे काय?
पर्सेटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी. सोप्या भाषेत सांगायचे तर, पर्सेटाइल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती जणांपेक्षा जास्त आहे, हे दाखवणारी टक्केवारी. उदाहरणार्थ समजा एखाद्या परीक्षेत १०० विद्यार्थी बसले आणि तुम्हाला २० पसेंटाइल आहेत, तर याचा अर्थ असा की, तुमच्यापेक्षा कमी गुण ९० विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
परीक्षार्थ्यांना 'केवायसी' बंधनकारक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागेल.
एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवणेही आवश्यक आहे. उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांची ओळख अचूक होईल, फसवणूक व चुकीच्या माहितीला आळा बसेल. भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येईल.
सरळसेवा भरतीच्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. एमपीएससीने सरळसेवा भरती परीक्षेला पसेंटाइल गुणांकन पद्धत लागू केली आहे, याचा अर्थ या परीक्षांवर एमपीएससीची देखरेख असेल. त्यामुळे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टळतील, अशी आम्हाला आशा आहे. -महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन