लासलगावात कांदा कडाडला, प्रति क्विंटल ४,९०० रुपये
By Admin | Updated: August 20, 2015 15:42 IST2015-08-20T15:42:54+5:302015-08-20T15:42:54+5:30
लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४,००० रुपयांवरून ४,९०० रुपये इतका कडाडला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सध्या प्रति किलो ६० रुपयांच्या घरात असलेला कांदा आणखी भडकण्याची शक्यता

लासलगावात कांदा कडाडला, प्रति क्विंटल ४,९०० रुपये
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २० - लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४,००० रुपयांवरून ४,९०० रुपये इतका कडाडला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सध्या प्रति किलो ६० रुपयांच्या घरात असलेला कांदा आणखी भडकण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीमध्ये तर आत्ताच कांद्याने प्रति किलो ८० रुपयांची पातळी गाठली आहे. पावसाने पाठ दाखवल्याचा परिणाम शेतीवर होत असून सद्यस्थितीत याचा विपरीत परिणाम कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे.
चिंतेची बाब म्हणजे पावसाने केवळ महाराष्ट्रात ओढ दिलेली नसून कर्नाटक, आंध्र व बिहारमध्येही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कृषिमालाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याचा आणि परिणामी महागाई वाढण्याचा धोका असल्याची भीती कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
अनेक कृषिप्रधान परीसरामध्ये अवघा १९ टक्के पाऊस पडला असून यानंतरच्या राहिलेल्या मोसमात फारसा फरक पडण्याची चिन्हे नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या महिन्याभरात चांगला पाऊस पडला तरीही एकंदर देशात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पावसाचा अंदाज आहे.
केंद्राने गेल्या आठवड्यात कृषिक्षेत्रासाठी ३०० कोटी रूपयांचं रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. त्यात डिझेल आणि बियाण्यांसाठी अनुदान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही दुष्काळग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीसारख्या योजना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.