जिरायती भागात दडी
By Admin | Updated: June 30, 2016 01:42 IST2016-06-30T01:42:20+5:302016-06-30T01:42:20+5:30
पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिरायती भागात दडी
काऱ्हाटी : पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा, व जिवापाड सांभाळलेली जनावरे कशी वाचवायची, या विचाराने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाळ्यातच ‘जनाई-शिरसाई’ योजनेतून बंधारे, पाझर तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हमखास समजला जाणारा खरीप हंगाम काऱ्हाटी, माळवाडी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ भागात वाया गेला आहे. तसेच, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, जनावरांचा चारा कसा घ्यायचा, याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. शेतकरी सगळीकडून आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बारामतीच्या पश्चिम भागातील अांबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, लोणकरमळा, अंजनगाव,
कऱ्हावागज, नेपत वळण, बऱ्हाणपूर भागात कऱ्हा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत.
>मेंढपाळांसाठी
घर कोसो दूर
लोणी भापकर : पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही बारामती तालुक्याचा ग्रामीण भाग अद्याप कोरडाच आहे. त्यातही तालुक्याच्या जिरायती भागातील पाणी आणि चाऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. पावसाने दडी मारल्याने सहा महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या येथील मेंढपाळवर्गासाठी अद्याप गाव आणि घर कोसो दूरच आहे. त्यामुळे सध्या अनेक मेंढपाळ बारामती शहाराच्या सभोवताली पालं टाकून पर्जन्यराजाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते.
बारामती तालुक्यातील उत्तर-पश्चिम पट्ट्यातील जोगवडी, पळशी, मोराळवाडी, मोढवे, मुर्टी, कानाडवाडी, लोखंडवाडी, सस्तेवाडी, मुढाळे, मासाळवाडी, तर सुपे परगण्यातील बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, वढाणे या भागातील अनेक कुटुंबे शेळी-मेंढीपालन
व्यवसायात आहेत.
क्षारयुक्त पाणी
पाऊस पडत नसल्याने घोर लागला आहे. जनावरांसाठी चारा पिके घेता आली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
चांगले पाणी नसल्यामुळे क्षारयुक्त पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली आहे.
खरीप हंगाम वाया गेल्यामुळे सलग चौथ्या वर्षीही दुष्काळ पडला आहे. सततची पाणी टंचाई व दुष्काळ, या भागातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला असल्याची खंत शेतकरी लालासो भोसले व भाऊसाहेब पिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना
व्यक्त केली.