ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. २४ - खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रोज येथे दोन तीन तरी छोटे मोठे अपघात घडत आहेत. यामुळे नागरिक व वाहन चालक यांच्यातून प्रशासनाविरूध नाराजीचा सूर निघत आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून केली जात आहे.कल्याण तालुक्यातील खडवली राया हा रस्ता महत्त्वाचा असून देखील या रस्त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. या रस्त्यावरून लगतच्या 30 ते 40 गाव, खेड्या पाड्यातील नागरिक व वाहन चालक वाहतुकीसाठी वापरतात. तसेच या रस्त्यावर सततची रहदारी आहे. सदर रस्ता मुंबई नाशिक, कल्याण-नगर, कल्याण-पुणे या महामार्गांना जोडला जातो. यामुळे सहाजिकच हा रस्ता सतत वर्दळीच्या स्वरूपात दिसत आहे. परंतू आज मितीला या रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत की, यामुळे या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी येथे वाहन चालवताना मोठीच कसरत करावी लागते. सदर रस्त्यावर वाहने चालविणार्या वाहन चालकांना पाठीच्या व मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून करण्यात येत आहे