जपू-जोपासू सृष्टीवैविध्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:30 IST2019-05-19T04:30:12+5:302019-05-19T04:30:18+5:30

निसर्गाचे प्रयोजनच वैविध्यासाठी आहे आणि ते वैविध्य आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. वेगवेगळी झाडेवेली, पशुपक्षी सृष्टीचक्र ाच्या निकोप परिचलनासाठी गरजेचे असतात. अन्यथा निसर्गाचा तोल ढळू लागतो आणि त्याचा परिणाम माणसावर होतो. त्यानंतर त्याला साक्षात्कार होतो की, आपण जैवविविधतेमध्ये बाधा आणतोय! निसर्गातली विविधता राखण्याचा साधा विचार वेळीच केला; तर निसर्गाच्या आणि आपल्याही जीवनात बाधा येणार नाही. त्यामुळे वेळीच शहाणं झालेलं बरं...

Jupiter-worldly creatures ... | जपू-जोपासू सृष्टीवैविध्य...

जपू-जोपासू सृष्टीवैविध्य...

- कौस्तुभ दरवेस

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. आपली पृथ्वी त्यावरील परिसंस्थेची, जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २२ मे २०१३ पासून हा दिवस जगभरात ‘जैवविविधता दिन’ म्हणून साजरा केला जातो.


जैवविविधता म्हणजे काय तर रेमंड एफ दासमान या वन्यजीव अभ्यासकाने ‘अ डिफरंट काइंड आॅफ कंट्री’ या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. जैवविविधतेचे महत्त्व याकडे लक्ष दिले असता ज्याप्रमाणे निरोगी जगण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व या सर्वांची गरज असते. कोणत्याही एका घटकाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तसेच जैवविविधतेच्या एका घटकाच्या नष्ट होण्यानेही सर्व सृष्टीचा समतोल ढासळू शकतो. जैवविविधतेचे स्वरूप हे अधिवासांवर अवलंबून असते. त्याचप्रकारे सजीव सृष्टीच्या निकोपवाढीसाठी जैवविविधता अत्यंत महत्त्वाची आहे.


जैवविविधता परिसंस्था, प्रजाती आणि जनुकीय अशा तीन पातळ्यांवर असते. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इत्यादी म्हणजेच परिसंस्थेची विविधता होय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी ही आहे जीवांची विविधता. एखाद्या जीवामध्ये/ प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात त्याला जनुकीय विविधता म्हटले जाते. जसे, आंब्याच्या तोतापुरी, देवगड हापूस, रायवळ अशा उपजाती आहेत.


अधिवासानुसारच तेथील जीवांची जडणघडण होत असते आणि या जीवांमुळेच अधिवासाचे संतुलनही राखले जाते. या परिसंस्थांना अनुकूल जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. कालौघात एखादी प्रजाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षांत जगातील जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल.


सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे नैसर्गिक अधिवासात झालेली घट. विशेषत: शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नष्ट झाले आहे. त्यामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.
मुंबई शहर आणि परिसरात राणीची बाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्य, मुंबईचे समुद्रकिनारे, शिवडी, ठाणे, ऐरोली खाडी परिसर भांडुप पम्पिंग स्टेशन अशा मोजक्या ठिकाणी जैवविविधता कशीबशी तग धरून आहे.


खाड्यांमध्ये तिवर म्हणजेच ग्रे मॅन्ग्रोव्ह ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. मेस्वाक नावाचे मॅन्ग्रोव्हदेखील ठाणे खाडीत आढळते. त्याशिवाय रेड मॅन्ग्रोव्ह, व्हाइट मॅन्ग्रोव्ह या त्यातील काही प्रजाती. याच खारफुटीच्या मुळाशी सुरक्षित जागी मासे आपली अंडी घालतात. पूर्वी साधारण १०० पेक्षा अधिक प्रकारचे मासे खाडीत सापडायचे. निवठा, मुगील, तिलापिया, तार्पोन, कॅटफिश इत्यादी. ठाण्याचे पक्षीवैभव राखण्यात या खाडीचा मोठा वाटा आहे. ठाणे खाडीत १५० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. यात पाणथळ जागेतील पक्षी आणि स्थलांतरित पक्षी यांचा मोठा वाटा आहे. घार, खंड्या, वेगवेगळ्या प्रकारची बदके, ग्रे हेरॉन, ओस्प्रे, सँडपायपर, कुदल्या, चित्रबलाक, छोटा रोहित, मोठा रोहित, आय्बीस असे अनेक पक्षी येथे आढळतात. मुरबाड आणि शहापूर भागात १९७२ पूर्वी मरळ नावाचा मोठा मासा आढळला. लक्ष्मीकमळ नावाच्या भारतीय कमळाच्या जातीचे अस्तित्वही येथे होते. या क्षेत्रात जांभळी पाडळ, पिवळी पाडळ, खड्गशेंग, करमळ, हुमण, कोरळ, दांडस हे दुर्मीळ वृक्ष आहेत.

(लेखक पर्यावरण विषयाचे अभ्यासक
आणि संशोधक आहेत.)

Web Title: Jupiter-worldly creatures ...