‘जातीव्यवस्था हा भारतासाठी मोठा शाप’
By Admin | Updated: August 2, 2016 04:01 IST2016-08-02T04:01:59+5:302016-08-02T04:01:59+5:30
‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे.

‘जातीव्यवस्था हा भारतासाठी मोठा शाप’
डोंबिवली : ‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे. आपल्या भारतात जातीव्यवस्था मोठा शाप आहे. ती संपेल तेव्हाच भारत जगात महासत्ता होईल, असा विश्वास चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
शिवसेना व कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे नुकताच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिंकण्याची साधना’ हा मार्गदर्शनपर मेळावा अत्रे रंगमंदिरात झाला. या वेळी धर्माधिकारी बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. नरेशचंद्र, महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले की, आपल्याला कोणालाही ज्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांचा मत्सर आणि मला काही येत नाही, त्याचा न्यूनगंड वाटण्याची गरज नाही. आपल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत होऊन भारतमातेची व देशाची सेवा घडो. राष्ट्रगीताचा सन्मान सर्वत्र राखला गेला पाहिजे.
राज्यघटना व त्यामुळे
मिळालेले मूलभूत अधिकारी हवेत, तर राष्ट्रप्रेम, कर्तव्य नाही का, असा सवालही त्यांनी केला. ज्यांचा मेंदू शाबूत आहे, तो प्रत्येक जण बुद्धिमान आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळ आणि कला याही बुद्धिमत्ताच आहेत. आपल्या बुद्धीचा कल आपण ओळखला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)