चंद्रपूरचा इटनकर राज्यात पहिला
By Admin | Updated: June 13, 2014 01:49 IST2014-06-13T01:49:26+5:302014-06-13T01:49:26+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले,

चंद्रपूरचा इटनकर राज्यात पहिला
युपीएससीचा निकाल जाहीर : देशात गौरव अग्रवाल अव्वल
मुंबई/पुणे/नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले, तर चंद्रपूरच्या विपीन इटनकर याने राज्यातून अव्वल स्थान पटकविले आहे. त्याने देशाच्या यादीत चौदावा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील सुमारे ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांची या परीक्षेत निवड झाली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०१३ मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती. तर मे आणि जून महिन्यात मुलाखती झाल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १ हजार १२२ उमेदवार उत्तीर्ण झाले.
यामध्ये ५१७ खुल्या गटातील, ३२६ ओबीसी, १८७ एससी आणि ९२ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. यशस्वी उमेदवारांमध्ये १५ अपंग उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाने या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि ब या पदांवर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.
राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश झाला आहे. प्रथमच नव्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा घेण्यात आली होती.
यंदा यूपीएससी परीक्षेला राज्यातून सुमारे साडेतीन लाख उमेदवार बसले होते. त्यामधून मुख्य परीक्षेसाठी साधारण १७ हजार उमेदवारांची आणि मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी ३ हजार उमेदवार निवडण्यात आले होते. यामधून १ हजार १२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८०, आयएफएस ३२, आयपीएस १५०, केंद्रीय सेवा गट अ ७१०, गट ब १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे.सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. म्हणजेच निवड झालेल्या सर्वांना नियुक्त्या मिळू शकतील. (प्रतिनिधी)
विपीनच्या भरारीला
जिद्दीचे पंख
अभ्यासाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यात युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करताना नियोजनबद्ध अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. मुळात नोकरी सांभाळून आणि नोकरीतील ताणतणाव सांभाळून अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, याचा अनुभव मी घेतला. पण मनावरचा संयम, कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर निश्चितच यश मिळते, असे मत युपीएससी परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या विपीन इटनकरने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर खूप मोठे समाधान मिळाल्याची भावनाही त्याने यावेळी व्यक्त केली. विपीनने २००८ साली मेयो येथून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय पदवी एम. डी. करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. दरम्यानच्या काळात चंदीगड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे शिक्षण की नोकरी, या द्वंद्वात नोकरी करणे योग्य वाटले आणि चंदीगडला नोकरी पत्करली. सध्या तेथेच नोकरीसह युपीएससीची तयारी करून यश संपादन केले. परीक्षेच्या तयारीविषयी बोलताना विपीन म्हणाला, जवळपास ८ ते ५ नोकरी केल्यानंतर परीक्षेची तयारी केली. नोकरी म्हटली की ताणतणाव आलेच. त्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना आॅपरेशन्स, पेशंटची तपासणी हे व्यस्त ठेवणारे काम होते. नोकरी झाल्यावर अभ्यास करण्याची शक्ती क्षीण झालेली असायची. पण मनात जिद्द होती. यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची आणि थेट देशाच्या सेवेत सहभागी होण्याची मनोमन इच्छा होती. त्यामुळे संयमाने अभ्यासाला लागलो. यापूर्वीही तीनदा ही परीक्षा दिली असल्याने साधारणत: अभ्यासक्रमाची माहिती होती. पण परीक्षा दिल्यावरही यश मिळाले नाही. चौथ्या प्रयत्नात मात्र यश मिळाले.
चंद्रपूरच्या तुकूम भागातील आयप्पा मंदिराजवळ राहणाऱ्या विपीनचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथील विद्यानिकेतनमध्ये झाले. या यशात पत्नीचा फार मोठा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. तिनेच मला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या यशाचे संपूर्ण श्रेय माझी पत्नी आणि आईला आहे.