इतिहास चुकीचा मांडल्यानेच असहिष्णुता
By Admin | Updated: November 10, 2015 02:49 IST2015-11-10T02:49:12+5:302015-11-10T02:49:12+5:30
‘चुकीचा इतिहास समाजासमोर मांडणारे, शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी ठरवणाऱ्यांना राज्य शासन मानाचे पुरस्कार देत आहे. त्यामुळे असहिष्णू वातावरण समाजात वाढत आहे

इतिहास चुकीचा मांडल्यानेच असहिष्णुता
बारामती : ‘चुकीचा इतिहास समाजासमोर मांडणारे, शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी ठरवणाऱ्यांना राज्य शासन मानाचे पुरस्कार देत आहे. त्यामुळे असहिष्णू वातावरण समाजात वाढत आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. बिहारच्या निकालामुळे राजकीय बदलास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या वेळी पवार बोलत होते.
‘बिहारमधील सत्ताबदलाचे सूत्र देशभरात आणण्याची
वेळ आली आहे. महात्माजींचे चंपारण्यातील आंदोलन, तर जयप्रकाश नारायण यांचे आणीबाणीच्या विरोधी आंदोलन बिहारमधूनच देशभर पसरले, तसाच सत्ताबदल बिहारमधून सुरू झाला आहे.’
‘देशातील असहिष्णुतेचे वातावरण, मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे तेथील जनतेने भाजपाला नाकारले. लष्कराचे माजी प्रमुख असलेले मंत्री दलितविरोधी विधान करतात, तर मुस्लिमांची संख्या वाढली, म्हणून एक मंत्री हिंदूंना लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन करतात. अशा वाचाळवीरांना कोणत्याही जबाबदार पदावर नेमण्यात येऊ नये,’ असेही मत पवार यांनी मांडले