महागाईचा तडका !
By Admin | Updated: July 3, 2014 01:05 IST2014-07-03T01:05:59+5:302014-07-03T01:05:59+5:30
महागाईची झळ सामान्यांना बसते आहे. आजचे दर उद्या नाहीत व उद्याचे परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. उपराजधानीत जीवनावश्यक

महागाईचा तडका !
भाज्यांची स्वयंपाकघरातून एक्झिट : धान्यही आवाक्याबाहेर
नागपूर : महागाईची झळ सामान्यांना बसते आहे. आजचे दर उद्या नाहीत व उद्याचे परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. उपराजधानीत जीवनावश्यक वस्तू आणि धान्य व कडधान्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. वाढत्या साठेबाजीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसते आहे. इकडे भाज्यांचेही दर वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे.
कांदा रडवणार
मंगळवारी केंद्राने कांद्याचे निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन ५०० डॉलरपर्यंत वाढविल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये भाव अचानक वाढले. कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २० रुपयांवर गेले. किरकोळमध्ये कांदा दर्जानुसार २५ ते ३० रुपयांदरम्यान आहे. त्यात आणखी भाववाढ होऊ शकते, असे मत कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. निर्यात मूल्य वाढताच कळमन्यात आवक २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दिवाळीपर्यंत कांदा खाली येण्याची शक्यता नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड कमी झाली असून उत्पादन घटण्याची भीती आहे. लांबलेल्या पावसाने राज्यातील कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कांदा शेतकरी आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडे आहे. यंदा पाऊस लांबल्याने दक्षिणेतील कांदा पिकाचे भवितव्य काय राहील, हे आताच सांगता येणार नाही.
जीवनावश्यक वस्तूही महाग
सरकारच्या आकडेवारीत लोकांना स्वारस्य नाही. त्यांना वस्तूंचे दर समजतात व शंभर रुपयात काल ज्या वस्तू येत होत्या त्या आज येत नाहीत. त्याला आज जास्त पैसे मोजावे लागतात एवढेच समजते. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावांचा आलेख चढता आहे व ही महागाई कुठपर्यंत जाईल, या कल्पनेनेच सामान्य माणूस आज धास्तावलेला आहे. धान्य, कडधान्य, खाद्य तेल, भाज्या, दूध, चहा, साखर, गूळ यांचे भाव सतत वाढत आहेत व ते आणखी किती वाढणार आहेत, हे सांगता येणार नाही. डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत.
चणा डाळ व तांदूळ महागला
आठवड्यात चना डाळ आणि तांदळाचे भाव अचानक वधारले. यंदा पाऊस लांबल्याने ही वेळ ओढविली आहे. डाळ २०० रुपये तर तांदळाचे दर प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वधारले आहेत. ठोक बाजारात चना डाळ ३२०० ते ३८०० रुपये क्विंटलवर गेली. सुवर्णा तांदूळ प्रति क्विंटल २४०० ते २६५०, डीपीटी २८५० ते ३२५०, एचएमटी ३८०० ते ४२५०, श्रीराम ४४०० ते ५१५०, चिन्नोर ५००० ते ५४००, बासमती ७५०० ते १३ हजार रुपये भाव आहेत. गव्हाला मागणी नसल्याने भाव स्थिर आहेत. लोकवन १८०० ते २२५०, तिकडी २१०० ते २३५०, मध्यम शरबती २५०० ते २८००, बेस्ट शरबती २८०० ते ३२०० रुपये भाव आहेत. इतवारी ठोक बाजारात तूर डाळ ५४०० ते ६६००, मूंग मोगर ८०० ते ९५००, मंूग डाळ ७५०० ते ८५००, उडद मोगर ७००० ते ८५००, उडद डाळ काळी ५५०० ते ६५००, मसूर डाळ ६००० ते ६६००, हिरवा मटर ४२०० ते ४८०० मूंग हिरवा ६५०० ते ८५००, मोट ५५०० ते ७२००, बरबटी ४४०० ते ५८०० रुपये क्विंटल असल्याचे कळमना धान्य बाजारातील व्यापारी रमेश उमाटे यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचा फटका धान्य बाजारपेठांवर पडणार आहे. सरकारने तांदळाची निर्यात बंद केली आहे. काही शेतकी मालावरील आयात शुल्क हटवावे, अशी मागणी उमाटे यांनी केली.