राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा - उद्धव
By Admin | Updated: September 8, 2016 06:20 IST2016-09-08T06:20:58+5:302016-09-08T06:20:58+5:30
पोलिसांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ते थांबविण्यासाठी सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा - उद्धव
मुंबई : पोलिसांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ते थांबविण्यासाठी सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरील कामाचा ताण वाढलेला असल्याने गृह खात्यासाठी स्वतंत्र मंत्री असायला हवा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
राज्यात पोलिसांवरील हल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पोलिसांच्या कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पोलिसांच्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाली. पोलिसांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या समस्या मांडल्या. पोलिसांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेली एक समिती शासन स्थापन करणार असून त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, असे ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या केसालाही धक्का लागता कामा नये अशा उपाययोजना तातडीने कराव्यात या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे ते म्हणाले.