ठाणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सकाळी ज्या ठिकाणी सभा घेतली, त्याच ठिकाणच्या शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे.
खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची 'निष्ठा यात्रा' आणि 'शिवसंवाद यात्रे'ने ही पडझड रोखली जाणार की जाणार की उलट परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एका आठवड्यात एक नव्हे तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. पण उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर बेडवरून हलू शकत नाहीत, ही माहिती ज्या मिनिटाला कळाली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होऊ शकतो का, याची चाचपणी सुरु केली. आपल्यासोबत कोण येईल किंवा नाही, यादृष्टीने त्यांनी आमदारांची जमवाजमव सुरु केली. या गद्दारांची ही माणसुकी आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.