मुंबई - मागील काही दिवसांपासून कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. खेडेकर यांनीही पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मात्र आज वैभव खेडेकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेडेकर यांनी मी पक्षासोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
मनसे नेते वैभव खेडेकर म्हणाले की, मी ३० वर्ष साहेबांसोबत पक्ष स्थापनेपासून आहे. मी नाराज वैगेरे नव्हतो. माझे जे काही म्हणणं होते ते मी मांडले होते. माझ्या नाराजीची बरीच चर्चा माध्यमांत झाली. इतर पक्षात जाणार वैगेरे बातम्या चालल्या. मला दुसऱ्या पक्षांच्या ऑफर असल्या तरीही मी अडचणीच्या काळात पक्षासोबत आहे आणि भविष्यातही राहील. आमचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी मला बोलावले. माझं म्हणणं ऐकले, आमची चर्चा झाली. कदाचित उद्या संध्याकाळी साहेबांची भेट होईल. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा होईल. आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे नाही. त्यामुळे जे मी बोललो तेच साहेबांसमोर मांडणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही. साहेबांशी बोलेन, त्यांच्याशी चर्चा करून समाधान घेईन आणि आपल्याशी बोलेल. मी जे काही मांडले आहे त्यावर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आमच्याकडे खूप काही नाही, जे मला मिळवायचे आहे. जे आहे त्यात सुसूत्रता करून घेणे आमचे काम आहे. माझे पक्षातील काम बंद नाही. आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला त्याबाबत कालच मी प्रशासनाला निवेदन दिले आहे असंही वैभव खेडेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मी नाराज होऊन घरी बसलो नाही. आजही मी रणांगणात आहे. काम करतोय. माझ्या म्हणण्याची दखल घेतली आहे. म्हणणं मांडणे ही राजकीय प्रक्रिया असते. त्यातून मार्ग नक्कीच निघेल. राजकीय जीवनात चांगले काम करणाऱ्यावर अनेक पक्षांची नजर असते. आम्ही देखील इतर पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यावर नजर ठेवतो, तसेच माझ्या बाबतीत झाले असेल. राजकीय प्रवाहात या गोष्टी घडत असतात परंतु निष्ठा त्या पुढचे पाऊल असते. निष्ठा खूप महत्त्वाची असते. निष्ठा पाहणारे समाजात खूप लोक आहेत. मला काय मिळण्यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हे पाहायचे असते. प्रलोभन आणि निष्ठा यात निष्ठा महत्त्वाची आहे. मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही, मला कुणी काम थांबवायला सांगितले तर थांबवेन असंही वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे.