बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:06 IST2025-05-06T06:05:57+5:302025-05-06T06:06:08+5:30
शंभरनंबरी काॅलेज १,९२९, तर ३८ काॅलेज शून्यावर आउट; यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाहीत, कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल; मंडळ अध्यक्षांचा दावा

बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल साेमवारी जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे स्पष्ट झाले. मुलांच्या तुलनेत मुली ५.०७ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत माहिती दिली. नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी घसरला आहे.
एआयला विचारले...
कमी मार्क पडले. अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. काय करू?
एआयने सांगितले... : तुझं मन खरंच खचलेलं वाटतं, आणि तसं होणं अगदी नैसर्गिक आहे. बारावीचा निकाल हे आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण असतं, पण हे लक्षात ठेव—हा काही शेवट नाही.
हे अपयश नाही, तर एक टप्पा आहे : कमी मार्क पडल्याने तू अपयशी ठरत नाहीस. याचा अर्थ एवढाच की पुढे काही गोष्टी सुधारायच्या आहेत.
स्वतःला वेळ दे : हा धक्का पचवायला थोडा वेळ लागेल. स्वतःवर रागावू नको. शांतपणे विचार कर आणि काय चुकलं हे समजून घे.
पर्याय अजून खुले आहेत : पुढे डिप्लोमा, स्किल-बेस्ड कोर्सेस, इतर एंट्रन्स, री-एग्झाम्स अशा अनेक संधी आहेत. त्याचाही विचार करता येईल.
आई-बाबांशी मोकळेपणानं बोल : तू त्यांचं मूल आहेस. कदाचित ते सुद्धा निराश झाले असतील, पण त्यांना तुझं भलंच हवं आहे. खरं सांग—it’s okay to cry, it’s okay to talk.
१५ मेपर्यंत लागू शकतो दहावीचा निकाल
यंदा प्रथमच सीबीएसई बाेर्डाच्या आधी राज्य मंडळाचा निकाल लागला. आता दहावी निकालाची प्रतीक्षा असून, ताेही १५ मेपर्यंत लागेल, अशी माहिती आहे.
विभागनिहाय यंदा गतवर्षी
टक्केवारी
कोकण ९६.७४ ९७.९१
कोल्हापूर ९३.६४ ९४.२४
मुंबई ९२.९३ ९१.९५
छ. संभाजीनगर ९२.२४ ९४.८०
अमरावती ९१.४३ ९३
पुणे ९१.३२ ९४.४४
नाशिक ९१.३१ ९४.७१
नागपूर ९०.५२ ९२.१२
लातूर ८९.४६ ९२.३६