Hindi Language Controversy in Schools Maharashtra: पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला. याबाबत शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शुद्धीपत्रक काढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis ) यांनी हिंदीची सक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. पण 'राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४' नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. हिंदीऐवजी इतर भाषाही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची परवानगी असेल. पण त्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शवल्यास, त्या भाषेकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, अन्यथा ती ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) यांनी फडणवीसांवर जहरी टीका केली आहे.
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला! तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार, इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान २० विद्यार्थ्यांची अट, म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट!" असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला.
"मराठीचा खून पाडण्याची सुपारी"
"हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते. वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे," असे ते म्हणाले.
अजित पवारांवर टीका
"अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय ? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा “ एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती” चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!" अशीही टीका सपकाळ यांनी केली.