राज्यात मानवी तस्करीच्या सर्वाधिक घटनांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 03:07 IST2020-10-05T03:06:32+5:302020-10-05T03:07:32+5:30
वर्षभरात तब्बल १ हजार महिलांची सुटका

राज्यात मानवी तस्करीच्या सर्वाधिक घटनांची नोंद
- विवेक भुसे
पुणे : वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी सर्वाधिक प्रमाणात होत आहे. देशभरात सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदविल्या जात आहे. महाराष्ट्राचा वाटा १२. ८ टक्के इतका आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश (१० टक्के) आणि कर्नाटक (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ हजार २० जणींची सुटका केली. त्यामध्ये ९४६ हून अधिक महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणले होते. सुटका केलेल्या ९७८ महिलांपैकी ८७६ या देशाच्या विविध भागातील, तर ३१ बांगाादेशी आणि ३१ इतर देशातील होत्या. महाराष्ट्र पोलिसांनी ६५८ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४०७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. परंतु, त्यापैकी केवळ एकाला शिक्षा ठोठावण्यात आली.
२०१९ मध्ये राज्यात ६१४ गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आसाम, मध्य प्रदेशाचा क्रमांक लागतो.