हर्षालीने सर केला द्रौपदी दांडा
By Admin | Updated: June 27, 2016 02:53 IST2016-06-27T02:53:34+5:302016-06-27T02:53:34+5:30
हर्षाली वर्तक-पाटील या तरूणीने हिमालयातील डी.के.डी.(द्रोपदीचा दांडा ) म्हणून ओळखले जाणारे १८७०० फूट उंच शिखर सर केले आहे.

हर्षालीने सर केला द्रौपदी दांडा
वसई : पालघर जिल्ह्यातील वसई,मांडलई येथील हर्षाली वर्तक-पाटील या तरूणीने हिमालयातील डी.के.डी.(द्रोपदीचा दांडा ) म्हणून ओळखले जाणारे १८७०० फूट उंच शिखर सर केले आहे. नेहरू इन्स्टिट्यूट आॅफ माउंटनिअरींग, उत्तरकाशी (निम) या संस्थेच्या वतीने आयोजिलेल्या शिबीरात तिची निवड केली गेली होती. आॅक्टोंबर २०१५ ला बेसीक कोर्स अ श्रेणीत पूर्ण करून मुंबईमधून अॅडव्हान्स कोर्सला जाणारी हर्षाली ही पहिलीच आहे. २७ मे ते २३ जून २०१६ या कालावधीत हे साहसी शिबीर आयोजीत केलेले होते.निमच्या वतीने देशभरातील ३५ महिला गिर्यारोहकांना या शिबीरात प्रवेश देण्यात आला होता.
प्रत्यक्षात मोहिमेला ४ जूनला सुरूवात झाली होती.भूवानी कॅम्प- तेला- जंगल कॅम्प- गुज्जर हट- बेस कॅम्प- समीट कॅम्प - समीट अटेंड अशा स्टेप पार करत या चमूने १६ जून रोजी डी.के.डी. शिखर पार केले.साधारण १८००० फूटाला डेडलाईन घोषित केलेली आहे. त्यानंतरच गिर्यारोहकांची खरी कसोटी लागते. इतक्या उंचावर वातावरणात आॅक्सीजन कमी असल्यामुळे पाणीही भरपूर प्यावे लागते. उणे १० अंश टेंपरेचर,बोचरी थंडी, जोरदार हवा आणि क्षणाक्षणाला वातावरणात होणारा बदल आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करीत असतो.
तीव्र डोकेदुखी, उलटी व चेहरा सुजणे या त्रासांनाही काही वेळा गिर्यारोहकांना सामोरे जावे लागते. पाठीवर १५ किलो वजनाचे सामग्री घेऊन आठ ते दहा तास चालत असतांना बर्फातील धोकादायक भेगांवरही (क्रि वासेस) नेहमी लक्ष ठेवावे लागत असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशामुळे वसईतील हौशी गिर्यारोहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या हर्षालीने या अगोदरही अनेक साहसी शिबीरात सहभाग घेतला आहे. २०११ ला तिने फ्रेन्डशीप पिक या मनाली येथील पीर पंजाब रेंज (१७३५३ फूट) ची मोहिम यशस्वी केली होती.वसई अॅडव्हेंचर क्लबच्या वतीने २०१२ व २०१३ साली घेतलेल्या हनुमान टिब्बा (१९४५० फूट) व माऊंट युनाम (२००५९ फूट) या मोहिमेत सहभाग तसेच आॅगस्ट २०१५ ला सह्याद्री अॅडव्हेंचर क्लब आयोजित माऊंट मँन्थोसा (२११४० फूट) या मोहिमा तिने यशस्वीरीत्या पार केलेल्या आहेत. लग्नाला केवळ एक महिना झाला असतांनाही पती विनीत पाटील यांच्या आग्रहामुळे व वडील अशोक व आई निमा वर्तक यांच्या प्रोत्साहनामुळे ती या साहसी शिबीरात दाखल झाली होती. २८ दिवसांच्या या खडतर ट्रेनिंगमुळेच तीला हे यश प्राप्त झाले असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवत होते. (प्रतिनिधी)
भविष्यात आर्थिक मदत मिळाल्यास हिमालयातील कांचनगंगा हे शिखर सर करणार असल्याचे तिने सागितले.वसई-विरार महापालिकेच्या वतीने हर्षालीसारख्या साहसी गिर्यारोहकांना आर्थीक पाठबळ देऊन प्रोत्साहन द्यायला हवे असे वसईकरांची मागणी आहे.