स्मार्ट सिटीपेक्षा आनंदी शहरे आवश्यक
By Admin | Updated: May 7, 2017 04:25 IST2017-05-07T03:27:48+5:302017-05-07T04:25:06+5:30
‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते

स्मार्ट सिटीपेक्षा आनंदी शहरे आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मते कुणीच विचारणार नाही. त्यांच्या हातात तुमचा ‘आत्मा’ द्यायचा की नाही, ही तुमची निवड आहे,’ अशा शब्दांत जागतिक
कीर्तीचे तंत्रज्ञ-संशोधक डॉ. सॅम पित्रोदा यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीका केली.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘इंटरनेट अँड फ्युचर वर्ल्ड आॅर्डर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. फाईव्ह एफ वर्ल्डचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.
इंटरनेट, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढणार आहे; पण त्याला आपण रोखू शकत नाही. उलट, त्यादृष्टीने प्रत्येकाने सज्ज राहायला हवे. या बदलांचा स्वीकार करीत स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. इतकी वर्षे होऊनही भारताचे स्वत:चे सर्च इंजिन नाही.’’
कोट्यवधी लोक फेसबुक, टिष्ट्वटरचा वापर करीत आहेत; पण त्याचे सर्व्हर दुसऱ्या देशात आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी खंतही डॉ. पित्रोदा यांनी व्यक्त केली.
इंटरनेटचा वाढलेला वापर विस्मयकारक
डॉ. पित्रोदा म्हणाले, ‘‘आज जगभरात इंटरनेटचा वाढलेला वापर हा विस्मयकारक असून गेल्या अनेक दशकांत झालेला या क्षेत्राचा विस्तार महत्त्वाचा आहे. हा विस्तार लक्षात घेत इंटरनेटद्वारे केवळ भारतीयच जगभरात बदल घडवू शकतात. मात्र, असे असले तरी स्वत:ची क्षमता ओळखण्यासाठी आपण असमर्थ आहेत.
आज दैनंदिन जीवनाशी निगडित जवळजवळ प्रत्येक गोष्टीशी इंटरनेट जोडले गेले आहे. काही वर्षांआधी अमेरिका हा याच तंत्रज्ञानामुळे विकसित देश समजला जायचा; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भारतातही इंटरनेटचा झालेला प्रसार हा वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे आज असलेली लोकसंख्या आणि साधने यांचा विचार केला, तर इंटरनेट क्षेत्रात आपण भारतीयच बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास आहे. मात्र, हे होत असताना या क्षेत्रात नवीन मॉडेल आणणे गरजेचे असून ते आणण्याची क्षमता असूनदेखील ती कृती करण्यासाठी आपण असमर्थ आहोत, हेही आपल्याला जाणून घ्यायला हवे.’’