सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा
By Admin | Updated: September 17, 2016 03:39 IST2016-09-17T03:39:23+5:302016-09-17T03:39:23+5:30
कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले

सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा
मोखाडा : कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आले का फोटो काढायला!’ असा संतप्त सवाल सागरच्या आई व आजीने विचारून मंत्रीमहोदयांचा अक्षरश: पाणउतारा केला. दारातच असा पाणउतारा झाल्याने मंत्रीमहोदयांना आपल्या ताफ्यासह माघारी परतावे लागले.
३० आॅगस्ट रोजी सागरचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. हा प्रकार आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कुपोषणबळी कुटुंबाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गुरुवारी सकाळी उशिरा पालकमंत्र्यांनी खोचगावातील पीडित कुटुंबीयांना भेट दिली. परंतु, या वेळी पालकमंत्र्यांना मृत सागरच्या आई व आजीने दारातच अडवले व जाब विचारला. यामुळे ताफ्यासह आलेल्या पालकमंत्र्यांना दारातूनच माघारी परतावे लागले. यानंतर, पालकमंत्र्यांनी खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणबळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट न देता जव्हारकडे रवाना झाले.
सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या बालसंजीवन छावणीमध्ये उपचार घेत होता. सरकारने व्हीसीडीसी ही कुपोषण निर्मूलन व सकस आहार देणारी योजना सुरू केल्याची घोषणा केली आणि सागरचे पालक त्याला घरी घेऊन आले. मात्र, सरकारची योजना कागदावरच राहिली आणि त्यानंतर उपचाराअभावी सागरचा मृत्यू झाला.
पालकमंत्र्यांच्या उशिरा हजेरीमुळे श्रमजीवीचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा, गणेश माली यांनी काळ्या फिती लावून पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी गेल्या वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मरण पावली आहेत. आपण काय केले, असा सवाल विचारताच पालकमंत्र्यांचा तोल गेला. सवरा म्हणाले, ‘मेली, मग काय झाले, असू देत ना, बघू आम्ही करू काय ते’ अशी मुक्ताफळे उधळली.
गावात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही
आता आम्ही सगळ्यांनी मिळून निर्धार केला की, आता आदिवासींची थट्टा पुरे. नुसते दौरे अन् भेटी नको. जोपर्यंत पालघर जिल्ह्यातील बालविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, शून्य ते ६ वयोगटांतील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला गरोदर काळापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही, तोपर्यंत गावात एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही.
- पांडू मालक,
सरपंच, खोच ग्रामपंचायत