मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची परीक्षेची घडी अद्याप यायची आहे, पण त्यांचा मार्ग योग्य आहे, असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.स्वत: या सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याचा इन्कार करून पवार म्हणाले की, विचारल्याशिवाय सरकारला सल्ला द्यायचा नाही, अशी भूमिका मी घेतली आहे. राज्यहिताबाबत काही सूचना असतील, तर त्यावर पक्षांतर्गत चर्चा होते. उद्धव यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. ज्यांना जे काम दिले ते त्यांनी करावे, त्यात हस्तक्षेप नाही, अशी त्यांची भूमिका असते.राज ठाकरेंशीही संवादमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मतभेद असतील, पण मनभेद नाही. सुसंवाद आहे. आजही आमचे बोलणे होत असते. राजकारणात एक पोकळी असते.तीन पक्षांचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून पोकळी दिसते. ती भाजप भरून काढेल की मनसे, हे येणाऱ्या काळात ठरेल, असेही पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल; शरद पवारांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:40 IST