घरातला कमावता व्यक्ती गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी अन् कसं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 19:23 IST2022-11-09T19:23:43+5:302022-11-09T19:23:57+5:30

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना : अनुदान नसल्याने प्रकरणे पडून, प्रत्येक तालुक्यात ही योजना राबविली जात असून तहसीलदारांना योजना मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयात माहिती मिळू शकते.

Government help is available, Know National Family Financial Assistance Scheme | घरातला कमावता व्यक्ती गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी अन् कसं? जाणून घ्या

घरातला कमावता व्यक्ती गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी अन् कसं? जाणून घ्या

नाशिक : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुखाचा मृत्यू झाला तर लाभ अर्थसाहाय्य योजना? संबंधित कुटुंबीयांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दरवर्षी साधारण ३० ते ४० प्रकरणे दाखल होतात. परंतु केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या निधीवर त्यांची अर्थसाहाय्य योजना अवलंबून आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या योजनेला अजूनही निधी प्राप्त झालेला नाही.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एकरकमी २० हजाराचे अर्थसाहाय्य देण्यात येते. प्रत्येक तालुक्यात ही योजना राबविली जात असून तहसीलदारांना योजना मंजुरीचे अधिकार देण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयात माहिती मिळू शकते. अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली तर पुरेसे कागदपत्रे जमा करून तहसील कार्यालयात सादर केल्यास कुटुंबीयांना मदत मिळणे सुलभ होणार आहे. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेबाबत दाखल होणारे अर्ज निकषानुसार मंजूर केली जात असली तरी निधी उपलब्ध नसेल तर संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी वाट पाहावी लागते.

काय आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना?
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एकरकमी वीस हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यासाठी तहसील प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक असतो.

पाच वर्षांत मिळाले लाखो रुपये
या योजनेत एका कमावत्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २० हजार रुपये दिले जातात. साधारणपणे दरमहा सररासरी ४० प्रकरणे येत असल्याने गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य केले जात असल्याने दिसून येते. यंदा प्रकरणे प्रलंबित राहिल्याने संख्या वाढलेली दिसते.

कोणाला मिळतो लाभ?
एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, कुटुंब निराधार झाले असेल, तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेद्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो. या पातळीवर संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करता येणार आहे.

अर्ज कोठे करायचा?
या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तालुका तहसीलदारांकडे अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक असते. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक आहे. मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्या संदर्भातील तलाठ्यांकडून मिळणारा दाखलाही जोडणे आवश्यक आहे.

यावर्षी ४० अर्ज, मदत एकालाही नाही
या योजनेंतर्गत यावर्षी एकूण ४० प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये नाशिक तालुक्यातून १० तर शहरी भागातून ३० प्रकरणे मदतीसाठी दाखल झालेली आहेत. ही सर्व प्रकरणे मंजूर असून अद्याप अनुदान प्राप्त नसल्याने प्रकरणे प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर पर्यंत अनुदान प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे तहसीलकडून सांगण्यात आले.

लागलीच वितरण
केंद्र पुरस्कृत योजना असल्याने निधी प्राप्त झाल्यानंतर लागलीच पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य योजनेतून मदत केली जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून योजनेचे अनुदान विस्कळीत झालेले आहे. अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही त्यामुळे यंदा प्रकरणे अधिक वेळ प्रतीक्षेत आहेत. साधारणपणे डिसेंबर पर्यंत अनुदान प्राप्त होण्याची शक्यता असून अनुदान मिळताच वितरण केले जाईल असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Government help is available, Know National Family Financial Assistance Scheme