मुंबई : आंबेडकर भवन तोडल्याप्रकरणी आरोपी असलेल्या सहा जणांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.नागसेन सोनारे, उत्तमराव बोधवडे, अभय बांबोले, श्रीकांत गवारे, आर. आर. शिंदे व विजय रणपिसे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आंबेडकर भवन तोडणे, चोरी, दरोडा इत्यादी गुन्हे या सहाही जणांवर नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे या सहाही जणांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला.ही केस फौजदारी नसून दिवाणी आहे, असे म्हणत सत्र न्यायालयाने या सहाही जणांची जामिनावर सुटका केली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.‘आंबेडकर भवनासंदर्भातील एक याचिका उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठापुढे प्रलंबित असल्याने राज्य सरकारने अशा प्रकारे स्वतंत्र याचिका दाखल करण्याऐवजी त्याच खंडपीठापुढे अर्ज करायला हवा होता,’ असे आरोपींचे वकील विनोद संगवीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आंबेडकर भवन प्रकरणातील आरोपींविरुद्ध सरकार अपिलात
By admin | Updated: October 9, 2016 02:15 IST