गोपीनाथ मुंडेचा संघर्षमय प्रवास
By Admin | Updated: June 3, 2014 18:16 IST2014-06-03T10:18:20+5:302014-06-03T18:16:58+5:30
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा हादरा बसला असून तळागाळातील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदावर झेप घेणा-या मुंडेचा राजकीय प्रवास संघर्षमयीच होता.

गोपीनाथ मुंडेचा संघर्षमय प्रवास
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३ - केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा हादरा बसला असून तळागाळातील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदावर झेप घेणा-या मुंडेचा राजकीय प्रवास संघर्षमयीच होता. मात्र या अडथळ्यांवर मात करत मुंडे जिद्दीने पुढे जात राहिले. मुंडेच्या या कारकिर्दीचा लोकमतने घेतलेला हा आढावा...
परळी तालुक्यातील नाथ्रा गावात १२ डिसेंबर १९४९ रोजी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला होता. मुंडेची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने मुंडेच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. अंबाजोगाई येथे बीकॉमचे शिक्षण घेत असताना मुंडे विद्यार्थी चळवळीत सक्रीय झाले. या दरम्यान त्यांचा परिचय प्रमोद महाजन यांच्याशी झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुंडेंनी स्वकर्तुत्वावर राजकारणावर ठसा उमटवला. जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक लढवणारे मुंडे पुढे आमदार व त्यानंतर खासदारही झाले. राज्यात युतीची सत्ता आल्यावर मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही भूषवले होते. तसेच विरोधी बाकावर असताना मुंडेंनी अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका बजावली होती. विधान भवनात मुंडेंच्या कोपरखळ्या सर्वश्रूतच होत्या. मुंडेचे राजकीय वजन वाढत असतानाही त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ सोडली नव्हती. बहुधा यामुळेच दिल्लीत बसूनही मुंडेची राज्यातील भाजपवर चांगलीच पकड होती.एकीकडे मुंडे यशस्वी वाटचाल करत असताना पुतण्या व भावाने त्यांची साथ सोडली. हे दोघेही राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाल्याने मुंडेंसाठी हा एक मोठा धक्काच होता. मात्र यातून सावरत त्यांनी लोकसभा निवडणुकीच बीडमध्ये दमदार विजय मिळवला.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात मोदींना स्थान मिळाले. ग्रामविकास खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. केंद्रात गेल्यावरही मुंडे यांचा राज्यातील प्रभाव कमी झाला नव्हता. यंदाची विधानसभा निवडणूक मुंडेच्या नेतृत्वाखाली लढवू असे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत होते. सत्ता आल्यास मुंडेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असे भाकीत वर्तवले जात होते. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यावर मुंडे प्रथमच मंगळवारी परळीत येणार होते. यासाठी परळी व बीडमध्ये भव्य समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सोहळ्याला येण्यासाठी निघालेल्या मुंडेवर दिल्लीत काळाने घाला घातला. या हरहुन्नरी नेत्याच्या अकाली निधनाने सर्वांना घेऊन पुढे जाणारा एक सक्षम नेता महाराष्ट्राने गमावला अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तूळातून व्यक्त होत आहे.
मुंडेचे कुटुंब
गोपीनाथ मुंडे यांची पत्नी प्रज्ञा मुंडे या पदवीधर असून त्या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या बहिण आहेत. अंबाजोगाई येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मुंडे व त्यांची ओळख झाली होती. राजकीय वाटचालीत माझ्या पत्नीने नेहमीच खंबीर पाठिंबा दिला असे मुंडे नेहमी सांगायचे.