मुंबई - गेल्या चार ते पाच वर्षांपासून आम्ही पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करतोय. पण प्रत्येक वेळी थोडक्यात संधी हुकते. त्यात मागील दोन वर्षांपासून नवीन भरतीच निघाली नाही. आता वयोमर्यादेमुळे पोलीस भरतीसाठी संधी हुकण्याची शक्यता आहे. आम्ही खूप मेहनत केली असून पोलीस भरतीची शेवटची संधी द्या, अशी मागणी भर पावसात आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या शेकडो युवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने नुकतीच १५ हजार पोलीसांची भरती जाहीर केली आहे. यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयानुसार २०२२ व २०२३ मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एका वेळची विशष बाब म्हणून भरतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. मात्र २०२४ व २०२५ साली वयोमर्यादा ओलांडलेल्या युवकांना पोलीस भरतीत संधी देण्याबाबत शासन निर्णयात कोणताही उल्लेख नाही.
२०२४ व २०२५ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या ३३ ते ३४ वयोगटातील युवकांना या भरतीतून डावलण्यात येत आहे. यामुळे युवकांचे आयुष्य अंधारात ढकलले गेले आहे. सरकारने विशेष बाब म्हणून या पोलिस भरतीसाठी संधी द्यावी.- निरंजन राठोड, आंदोलक, बुलडाणा