पोलीस महासंचालकांच्या दरबारात बदल्यांचा खेळ
By Admin | Updated: June 23, 2014 01:10 IST2014-06-23T01:10:52+5:302014-06-23T01:10:52+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फाईलीतच अडकले आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील

पोलीस महासंचालकांच्या दरबारात बदल्यांचा खेळ
स्वेच्छा बदलीचे अर्ज फाईलीत
राजेश निस्ताने - यवतमाळ
राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फाईलीतच अडकले आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील आबा-दादा-भाऊ-साहेब यांच्या एका फोनवर नियमावली गुंडाळून ठेवत बदल्यांचे आदेश फिरविले जात आहेत.
सुरुवातीला ताठर भूमिका घेणाऱ्या महासंचालक कार्यालयाने आता सरकारपुढे नमते धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, स्वत:चा आजार, पत्नी, आई-वडिलांचा आजार, कौटुंबिक अडचणी यामुळे अनेक अधिकारी ठाणेदारकी, वरकमाईची ‘की-पोस्ट’ सोडून नियंत्रण कक्षात अथवा साईड ब्रँचला नोकरी करण्यास तयार आहेत.
त्यासाठी त्यांनी आपल्या पोलीस प्रमुखामार्फत महासंचालकांना विनंती अर्जही पाठविले. परंतु महासंचालक कार्यालयातील कनिष्ठ यंत्रणा हेतुपुरस्सर हे अर्ज दडपून ठेवत आहेत.
तर दुसरीकडे बदलीचा कायदा आणि नियमावली गुंडाळून सर्रास पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यासाठी कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणा मोठी ‘उलाढाल’ करीत आहे. राजकारणातील बड्या नेत्यांच्या नावाने पीए मंडळी आयपीएस अधिकाऱ्यांना फोन करतात, अप्रत्यक्ष धमकावतात आणि पाहिजे त्या अधिकाऱ्याची सोईच्या ठिकाणी नियुक्ती करून घेतात. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेले डझनावर अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात सहज सापडतील, अशी स्थिती आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास आपल्या अधिनस्त अनेकांवर कारवाईची वेळ महासंचालक कार्यालयावर येणार आहे.
हे आणखी काही पुरावे
-नाशिक रोडवरून आलेल्या एका पोलीस निरीक्षकाला नागपूर ग्रामीणच्या वाहतूक शाखेचे प्रमुख बनविण्यात आले. त्यासाठी सोलापूरच्या पीएने थेट मॅडमला फोन फिरविला. विशेष असे, एका बिल्डरच्या तक्रारीवरून हा निरीक्षक व तीन पोलीस शिपायांवर नाशिक शहरात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यात ते ४० दिवस न्यायालयीन कोठडीत होते.
-न्एक पोलीस निरीक्षक ७ जून २००६ पासून सलग नागपूर ग्रामीणमध्ये सेवा देत आहेत.
-एक पोलीस निरीक्षक पाच ते सहा वर्षांपासून नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत आहेत. नरखेडला मार्गावर असताना आजाराची कारणे देऊन त्यांनी साईड पोस्टिंग मागितली होती. आता कदाचित आजार सुधारल्याने की काय त्यांनी कळमेश्वर रोडवर ठाणेदारकी स्वीकारली.
-नाशिक ग्रामीणहून बदलून आलेले एक निरीक्षक राजकीय संबंधावर उमरेडमध्ये ठाण मांडून आहेत. ते आपली दादा-आबाशी सलगी असल्याचे जाहीररीत्या सांगतात.