पोलीसपुत्रासह चौघांचे अपहरण
By Admin | Updated: May 27, 2014 01:45 IST2014-05-27T01:45:29+5:302014-05-27T01:45:29+5:30
विरोधी टोळीतील तरुणाचा गेम करण्यासाठी सुमित ठाकूर टोळीने पोलिसाच्या मुलासह चार विद्यार्थ्यांचे अपहरण केले. त्यांना बेदम मारहाण केली. गुन्हे शाखेचे पोलीस वेळीच

पोलीसपुत्रासह चौघांचे अपहरण
‘गेम’ करण्याचा कट फसला : कुख्यात सुमित ठाकूर जेरबंद
नागपूर : विरोधी टोळीतील तरुणाचा गेम करण्यासाठी सुमित ठाकूर टोळीने पोलिसाच्या मुलासह चार विद्यार्थ्यांचे अपहरण केले. त्यांना बेदम मारहाण केली. गुन्हे शाखेचे पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी कुख्यात सुमितला त्याच्या एका साथीदारासह जेरबंद केले. या घटनेने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. गड्डीगोदाममधील सचिन गुप्ता याच्या वडिलांचे स्वीट मार्ट आहे. गिट्टीखदानमधील कुख्यात ‘पिन्नू’ टोळीचा सचिन सदस्य आहे. तो १५ दिवसांपूर्वी मोमीनपुर्यात गेला होता. तेथील कुख्यात शानूसोबत त्याचा वाद झाला. शानू हा कुख्यात सुमित ठाकूर टोळीचा सदस्य आहे. शानूने सचिनला धमकावल्याचे माहीत पडताच पिन्नू आपल्या टोळीसह गड्डीगोदाममध्ये गेला. त्याने सचिन गुप्ताला सोबत घेतले. गड्डीगोदाममध्ये बेदम धुलाई सर्वांनी शानूला मोमीनपुर्यातून उचलून गड्डीगोदाममध्ये आणले आणि त्याची बेदम धुलाई केली. शानूने हा प्रकार कुख्यात सुमितला सांगितला. त्याचा बदला घेण्यासाठी शानू आणि सुमितच्या टोळीतील गुंड संधी शोधत होते. सचिनसोबत मृणांक मनोज उके (वय १७), ऋृषी मिश्रा (रा. जरीपटका), अखिलेश गोंडाणे आणि गुरुवीरसिंग बावरा हे चौघे सदरमधील तुली हॉटेलसमोर दिसताच सुमितच्या टोळीतील गुंडांनी त्यांचे अपहरण करून त्यांना गांधीसागर तलावाच्या काठावर असलेल्या एका पडक्या इमारतीत आणले. येथे या चौघांचीही कुख्यात सुमित, शानू आणि त्याच्या साथीदारांनी बेदम धुलाई केली. सचिन गुप्ताला येथे बोलव, असे आरोपी त्या चौघांना सांगत होते. सचिन आला की त्याची हत्या करण्याचा कुख्यात सुमित-शानू टोळीचा कट होता. मात्र, वारंवार फोन करूनही सचिन तलावाकाठी आला नाही. रात्रीचे १२ वाजले. या चौघांपैकी १२ वीचा विद्यार्थी असलेल्या मृणांक उके हा पोलीस कर्मचार्याचा मुलगा आहे. जखमी अवस्थेतील त्याला आणि त्याच्या मित्रांना सोडून दिल्यास पोलीस आपल्यावर कारवाई करतील, याची कल्पना आल्यामुळे कुख्यात सुमित-शानूच्या टोळीने त्यांना तलावात फेकण्याचा कट रचला. त्यासाठी पोतेही आणले. मात्र, वेळीच ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव गिरी यांना कळाली. त्यांनी पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, डीसीपी सुनील कोल्हे यांना कळवून तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसही हादरले हॉटेल रजवाडा पॅलेससमोर पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने शोधाशोध केली असता, सुमित ठाकूर आणि शेख शहवाज ऊर्फ पप्पू शेख मुबारक हे दोघे दिसले. त्यांना ताब्यात घेताच सुमितच्या टोळीतील शानूसह इतर आरोपी पळून गेले. त्यांनी जखमी अवस्थेतील मृणांक मनोज उके, ऋृषी मिश्रा, अखिलेश गोंडाणे आणि गुरुवीरसिंग बावरा यांनाही हाकलून लावले. मात्र, धावपळीत एकाची मोटरसायकल घटनास्थळी पडून राहिली. पोलिसांनी ती ताब्यात घेतल्यानंतर ती मृणांकची असल्याचे उघड झाले. त्यानंतर मृणांक आज गुन्हे शाखेत पोहोचला. त्याने उपरोक्त घटनाक्रम कथन केला. आरोपींनी मारहाण करून आपला टॅब आणि पैसे हिसकावून घेतले. ते सचिन गुप्ताची हत्या करून त्याच्यासह अनेकांना तलावात फेकण्याच्या तयारीत होते, असे सांगितल्यानंतर पोलिसांचीही भंबेरी उडाली. मध्यरात्रीचा प्रकार अपहरण, लुटमार आणि हत्येच्या कटाचा होता, हे कळताच पोलिसांनी तसे गुन्हे दाखल केले. कुख्यात सुमित आणि पप्पूला पोलिसांनी कारागृहात डांबले. पोलीस निरीक्षक माधव गिरी यांच्या नेतृत्वातील अविनाश शिळीमकर, पीएसआय अतुलकर, अब्दुल वहाब, रवी राठोड, विजेंद्र यादव, शेखर कभे, किशोर सोनटक्के, मिलिंद मून, सूर्यकांत चांभारे आता सुमितच्या टोळीतील शानू आणि इतर गुंडांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)