पाच दिवसांनी परतला अपहृत मुलगा
By Admin | Updated: June 19, 2014 03:00 IST2014-06-19T03:00:00+5:302014-06-19T03:00:00+5:30
पाच दिवसांपूर्वी अज्ञात अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आलेला चुनाभट्टी येथील भूषण सावंत हा आठवर्षीय मुलगा काल घरी परतला

पाच दिवसांनी परतला अपहृत मुलगा
मुंबई : पाच दिवसांपूर्वी अज्ञात अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आलेला चुनाभट्टी येथील भूषण सावंत हा आठवर्षीय मुलगा काल घरी परतला. पोलीस या प्रकरणातील अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.
दुसऱ्या इयत्तेत शिकणारा भूषण आईवडिलांसोबत चुनाभट्टीच्या प्रेमनगर परिसरात राहतो. शाळेला सुटी असल्याने शुक्रवारी तो येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे गेला होता. शनिवारी तो घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाला. त्याच्या मामाने परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्याच्या आईवडिलांसह मामाने सर्व परिसर पिंजून काढला. अखेर याच परिसरात राहणाऱ्या निमेश राणे या रहिवाशाने मुलाला एका तरुणासोबत जाताना पाहिल्याचे सांगितले. भूषणचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शोध सुरू असतानाच मंगळवारी रात्री अचानक हा मुलगा त्याच्या घराशेजारी असलेल्या मैदानात दिसला. येथील रहिवाशांनी त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती देताच त्यांनी मुलाला ताब्यात घेतले. मात्र
मुलाची प्रकृती खराब असल्याने त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करीत पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी या मुलाकडे विचारपूस केली असता, २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका इसमाने खाऊचे आमिष दाखवून आपल्याला चुनाभट्टी रेल्वे स्थानकाकडे नेले. तिथून वाशी, ठाणे आणि त्यानंतर नाशिक येथे नेऊन एका घरात दोन दिवस ठेवले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा चुनाभट्टीत आणून सोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या मुलाने केलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार केले असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)