- दिनकर रायकरमुंबई : यंदाचे पावसाळी अधिवेशन संपत असताना महाराष्ट्रातीलराजकारणात एक नवा इतिहास घडत आहे. १९७२ नंतर कोणत्याही एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. योगायोगाने वसंतराव नाईक ज्यांनी १३ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले तेही विदर्भातील होते. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी त्यांच्या एका जाहीर सत्कार समारंभात दिलेले एक उदाहरण महाराष्ट्राच्या आताच्याराजकारणाला चपखल लागू पडताना दिसत आहे. लता आणि आशा यांच्यातील नेमका फरक सांगताना आशा भोसले म्हणाल्या होत्या... चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉँग या अंतराळवीराचे नाव सगळ्यांना आठवते. पण त्या पाठोपाठ काही सेकंदात चंद्रावर उतरलेल्या एडवीन आॅल्ड्रिनची दखल तितक्या संस्मरणीय पद्धतीने घेतली जात नाही. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीचेही नेमके असेच तर आहे!यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यास ५९ वर्षे झाली. या दीर्घ कालावधीत यशवंतरावांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने पूर्ण टर्म मुख्यमंत्रीपद भूषविले. यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री पदावर बसले. अर्थात वसंतराव नाईक हे एकमेव की ज्यांनी पूर्ण टर्म (पाच वर्षे) मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगणारे फडणवीस दुसरे नेते ठरणार आहेत. वसंतराव काँग्रेसचे तर देवेंद्र भाजपचे. आता येत्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजतील तेव्हा मुख्यमंत्रीपदाची टर्म ते पूर्ण करतील. शिवसेना-भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हेही आपली टर्म पूर्ण करण्याच्या स्थितीत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतांना राजीनामा द्यायला लावला व अवघ्या आठ महिन्यांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद दिले.
अर्थात त्यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या मूल्यमापनाचे मापदंड या पहिला-दुसराच्या पलिकडचे आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मुलुखमैदान तोफा नसतानाही त्यांनी भाजपला जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका निवडणुकांमध्ये अव्वलस्थानी नेऊन ठेवले. लोकसभा निवडणुकीत एकहाती निर्भेळ यश मिळवून दिले. एक मराठा-लाख मराठा या घोषवाक्यातून बनलेला स्फोटक राजकीय बॉम्ब शिताफीने निकामी करण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले. मुद्दा जातीय प्रचार वा अभिनिवेशाचा नाही, पण एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण मंजूर केले, अशी नोंद त्यांच्यामुळे अपरिहार्यपणे होणार आहे. किंबहुना झाली आहे.