दोनदमध्ये आढळली घातक ‘सँडफ्लाय’
By Admin | Updated: September 20, 2014 01:06 IST2014-09-20T01:06:23+5:302014-09-20T01:06:23+5:30
डेंग्यूचे डासही आढळले, आरोग्य पथकाकडून पाहणी, औषधांचा केला पुरवठा.

दोनदमध्ये आढळली घातक ‘सँडफ्लाय’
सचिन राऊत / अकोला
बाश्रीटाकळी तालुक्यातील दोनद बु. हे नदीकाठावरील अख्खं गाव तापाच्या साथीने फणफणत असून, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य पथकाने गावात गुरुवारी सायंकाळी तपासणी केली. तपासणीमध्ये चंडीपुरा तापाचा थैमान घालणारी घातक सँडफ्लाय माशी आढळली असून, डेंगूयचे डासही आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागही हादरला असून, त्यांनी गावात औषधांचा पुरवठा सुरू केला आहे.
दोनद बु. ११५0 लोकसंख्या असलेले गाव. काटेपूर्णा नदीच्या तिरावर २५0 कुटुंब असून, त्यांना प्रशासनाकडून अद्याप परिपूर्ण मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गत तीन आठवड्यापासून गावात तापाच्या साथीने थैमान घातले असून, जलजन्य व कीटकजन्य आजारांनी ग्रामस्थ हैरान झाले आहेत. टायफाईड व व्हायरल तापाच्या साथीने गावातील एका चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ह्यलोकमतह्णने उघडकीस आणल्यानंतर आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथकाने गावात तपासणी केली. यामध्ये त्यांना सँडफ्लाय माशी व डेंग्यूचे डास आढळले आहेत. यामधील सँडफ्लाय माशी ही चंडीपुरा नावाचा तापाचा उद्रेक करणारी असून, त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती आहे.
गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून, हातपंपानजीक असलेल्या खतामधील घाणीमुळेही साथीचे आजार वाढले असल्याची शक्यता असल्याने ही तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत घातक असलेली सँडफ्लाय माशी व डेंग्यूचे डास आढळल्याने आरोग्य विभागही हादरला आहे. या गावातील नागरिक गत तीन आठवड्यापासून टायफाईड व व्हायरल तापाचा सामना करीत असून, सवरेपचार रुग्णालयामध्ये ३0 च्यावर रुग्णांवर ८ सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत. या तापाच्या उद्रेकाचा आजूबाजूच्या गावांना धोका असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उ पाययोजना सुरू केल्या आहेत.
सँडफ्लायमुळे चंडीपुरा नावाच्या आजाराचा उद्रेक होतो. नागपूर आणि चंद्रपूर परिसरामध्ये ही माशी आढळते आणि याच भागातून ही माशी जिल्हय़ात आल्याची शक्यता आहे. ज्या गावामध्ये ही माशी आढळली त्या ठिकाणी आवश्यक तो औषध पुरवठा करण्यात आला असून, तापाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी सांगीतले.