फास्टॅगचा वार्षिक पास लाँच करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून टोला नाक्यांवरून पास होण्यासाठी ३००० रुपयांचा पास दिला जाणार आहे. याद्वारे तुम्ही केवळ राष्ट्रीय महामार्ग जे एनएचएआयच्या अखत्यारीत येतात त्यावरूनच २०० वेळा टोल क्रॉस करू शकणार आहात. परंतू, महाराष्ट्राच्या वेगवान दळणवळणासाठी महत्वाचे असलेले मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या पासमध्ये येणार नाहीत. म्हणजेच वाहनधारकांना या मार्गांवरचा टोल हा द्यावाच लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मार्गांसाठी देखील पास लागू करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Fastag New Rules : कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. एमएसआरडीसी ही समृद्धी महामार्गासह या महामार्गांची देखरेख करते. यामुळे या महामार्गांवर भरमसाठ टोल द्यावाच लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या नावाची सुरुवात NH अशी होते तर राज्याच्या महामार्गांची सुरुवात ही MH MSH अशी होते. यामुळे एनएच आणि पुढे त्या महामार्गाचा नंबर असलेल्या महामार्गांवरच टोल पास वापरता येणार आहे.
मुंबई पुणे असा प्रवास करताना जुन्या हायवेवरून प्रवास केला तरच टोल पास वापरता येणार आहे. त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक्स्प्रेस हायवे बांधला होता. यामुळे जे पास घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी या गोष्टींचा जरूर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा पास कोणासाठी?हा पास जे लोक टोलबुथवरून किंवा टोलच्या रस्त्यावरून वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे. कधीतरी ये-जा करत असाल आणि जर तुमचा टोलवरील खर्चच जर वर्षाला ३००० रुपयांपेक्षा कमी असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही या पासच्या वाट्याला जाऊ नका.
जयंत पाटील काय म्हणाले...जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्या या टोल पासचे स्वागत केले आहे. तसेच राज्य सरकारकडे पुणे- मुंबई एक्सप्रेसवे अटल सेतू सह राज्याच्या महामार्गांवरही वार्षिक पासची मागणी केली आहे.