पीककर्ज फेडून शेतक-याने घेतला गळफास!
By Admin | Updated: March 13, 2016 02:30 IST2016-03-12T02:39:53+5:302016-03-13T02:30:25+5:30
पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची संपवली यात्रा.

पीककर्ज फेडून शेतक-याने घेतला गळफास!
बोरगाव मंजू (अकोला): गत काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस, सततची नापिकी यामुळे हतबल झालेल्या कट्यार येथील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. एरव्ही, कर्जाचे ओझे असह्य़ झाल्यामुळे शेतकर्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना उघडकीस येतात. या शेतकर्याने मात्र पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची यात्रा संपवली.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील सुरेश किसन खराटे (४८) यांच्याकडे आठ एकर शेती असून, यावेळी त्यांच्या पिकांनाही अत्यल्प पावसाचा फटका सोसावा लागला. त्यामुळे सोयाबीन व तूर पीक हातचे गेले. लावलेला खर्चही न निघाल्याने ते चिंतेत होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, बाळू खराटे यांनी माहिती दिल्यानंतर, बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर, पोलीस उपनिरीक्षक उईके, हेडकॉन्स्टेबल अरुण गावंडे, जनार्दन चंदन, हरीश सातव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
१२ फेब्रुवारीला केला होता कर्जाचा भरणा
नापीकीमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही सुरेश खराटे यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज फेडले होते. खराटे यांनी पिककर्ज म्हणून घेतलेली १ लाख १७ हजार ९२५ रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी रोजी सोसायटीत जमा केली. याबाबतचा ह्यनिलह्णचा दाखलाही त्यांना देण्यात आला आहे.