कारवाईनंतरही नियम पायदळीच

By Admin | Updated: September 4, 2014 00:53 IST2014-09-04T00:53:42+5:302014-09-04T00:53:42+5:30

आॅटो मीटरनेच चालावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करीत असली तरी बहुसंख्य रिक्षाचालक नियम पायदळी तुडवून व्यवसाय करीत आहेत. विशेष म्हणजे

Even after the action, the rule is very different | कारवाईनंतरही नियम पायदळीच

कारवाईनंतरही नियम पायदळीच

आॅटोचालकांकडून प्रवाशांची लूट : दीडपट भाड्याची आकारणी
नागपूर : आॅटो मीटरनेच चालावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करीत असली तरी बहुसंख्य रिक्षाचालक नियम पायदळी तुडवून व्यवसाय करीत आहेत. विशेष म्हणजे ९,६०० आॅटोरिक्षांमधून ९० टक्के रिक्षांना ई-मीटर लागले आहेत. परंतु यातील १० टक्केच रिक्षाचालक मीटरने चालत असल्याचे ‘लोकमत’च्या चमूला मंगळवारी आढळून आले.
शहराची लोकसंख्या पाहता त्यातुलनेत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची संख्या तोकडी आहे. यातच अनेक भागात स्टार बस जात नाही. प्रवाशांना आॅटोरिक्षाची मदत घ्यावी लागते. प्रवाशांच्या तक्रारीवरूनच राज्यात सर्व जुन्या नोंदणीकृत आॅटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे केले आहे. यातच आॅटोचे भाडेदरही वाढवून दिले आहे.
आॅटोचालकांसोबतच प्रवाशांचाही फायदा व्हावा, वाजवी दरात उत्तम दर्जाची सेवा मिळावी, हा उद्देश ठेवून आरटीओने १ सप्टेंबरपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. परंतु कारवाईची धास्ती दिसत असली तरी समोर आरटीओचे पथक आणि पोलीस नसल्याचे पाहत बहुसंख्य चालक मीटरने चालण्यास तयार नसल्याचे दिसून आले. यातील अनेकांनी आॅटो मीटरमध्ये सुधारित बदल व्हायचे असल्याचे कारण सांगितले, तर काहींनी मीटरने परवडत नसल्याचे सांगितले.
असे केले इन्व्हेस्टीगेशन
दुपारी १ वाजता : व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंपापर्यंत जाण्यासाठी आॅटोचालकाने ४० रुपये भाडे सांगितले. आॅटोमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले होते. मात्र त्यात सुधारित बदल व्हायचे असल्याचे कारण पुढे केले. साधारण दोन किलोमीटरच्या या अंतराला मीटरप्रमाणे २८ रुपये भाडे पडणार होते.
दुपारी २ वाजता : मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून सीताबर्डी जाण्यासाठी रिक्षाचालकाने ६० रुपये भाडे सांगितले. बसस्थानकावरून हे अंतर तीन किलोमीटर आहे.
भाडे कमी करण्यासाठी विनंती केली असता त्याने उद्धट उत्तर देत ७० रुपये सांगितले. दुसऱ्या एका आॅटोचालकाला विचारले असता, त्याने आणखी एक प्रवासी सोबत घेईन, अशी अट टाकून ४० रुपये भाडे सांगितले.
दुपारी ३ वाजता : गणेशपेठ बसस्थानक ते बर्डीपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटरने चालण्यास अनेकांनी नकार दिला. एक तयार झाला, परंतु त्याचे मीटर जुन्या भाडेदरानुसार चालणारे होते.
त्यानुसार पहिल्या किलोमीटरला १२ तर दुसऱ्या किलोमीटरला १० रुपये होते. मात्र, चालक नव्या भाड्यानुसार चालण्याच्या अटीवर येण्यास तयार होता. एकाने कशाला फंद्यात पडता म्हणून सल्ला दिला. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकांसाठी असे आहेत नियम
रिक्षाथांब्यावर रांगेत थांबूनच व्यवसाय केला पाहिजे. प्रवाशांना ओरडून बोलविण्यावर बंदी आहे. प्रवाशांसोबत सौजन्याने वागणे आवश्यक आहे.
अंगात खाकी गणवेश अनिवार्य. रिक्षात ई-मीटर, टेरिफ कार्ड, लायसन्स, बॅचबिल्ला, परमीट असणे आवश्यक.
१ सप्टेंबरपासून प्रति किलोमीटरसाठी १४ रुपये भाड्याची आकारणी केली पाहिजे.
फक्त रात्री १२ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान दीडपट भाडे आकारणी केली पाहिजे. इतर वेळी सिंगल भाडेच घेणे अनिवार्य आहे.
प्रत्येक थांब्यावर रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी दोन ते तीन रिक्षा असायल्या पाहिजेत.
रिक्षात रात्रीच्या वेळी दिव्यांची-उजेडाची सोय करणे बंधनकारक आहे. मीटर प्रवेशांना दिसेल असे असणे आवश्यक आहे.
हे नियम धुडकावून लावले जातात
शहरात फार कमी रिक्षावाले गणवेशात असतात. अनेकांकडे बॅचबिल्लेही नसल्याचे आढळून आले.
मीटरप्रमाणे आॅटोचालक चालायला तयार नसतात. प्रवाशांनाही मीटरविषयी माहिती नाही.
विशिष्ट आॅटो विशिष्ट ठिकाणीच जातो. इतरत्र जाण्यासाठी तो अव्वाच्या सव्वा रक्कम सांगतो.
मोरभवनच्यासमोर, झाशी राणी लक्ष्मीबाई चौक, व्हेरायटी चौक, बर्डीतील महाराष्ट्र बँकेच्या समोर आणि यशवंत स्टेडियमच्या समोर रस्ता अडवून आॅटोरिक्षा उभे असतात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर सुरू असते.
आसनक्षमता तीन असताना पाचच्यावरच प्रवाशांना घेऊन आॅटो धावत असतात.
महत्त्वाच्या थांब्यावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे.

Web Title: Even after the action, the rule is very different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.