बीडीओंच्या जाचास कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: July 5, 2016 16:13 IST2016-07-05T16:13:15+5:302016-07-05T16:13:15+5:30
देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी उदगीरच्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे़

बीडीओंच्या जाचास कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ५ : देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी उदगीरच्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे़. याप्रकरणी शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी नातेवाईकांनी गटविकास अधिकाऱ्यावर जाच केल्याचा आरोप केला आहे़
उदगीर तालुक्यातील मूळचे चांदेगाव येथील रहिवासी विवेक सिरसे (वय ४२) देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते़ ते उदगीरच्या विकास नगर भागात वास्तव्यास होते़ नोकरीसाठी दररोज उदगीर-देवणी ये-जा करायचे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात वावरत हाते, असा त्यांच्या कुटूंबियांचा दावा आहे़ त्यातच मंगळवारी सकाळी त्यांनी घरातच पंख्याला गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले़ यासंदर्भात त्यांचे बंधू वसंत शिरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
मयत विवेक शिरसे यांचे बंधू भाजपाचे उदगीर तालुकाध्यक्ष वसंत शिरसे यांनी ही आत्महत्या गटविकास अधिकाऱ्यांच्या जाचाला वैतागून केली असल्याचा आरोप केला आहे़ या जाचामुळे विवेक हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे दिसत होते, असे वसंत शिरसे म्हणाले़
नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाच होत असल्याचे तोंडी सांगितले आहे़ प्रारंभी आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद करुन घेतली आहे़ आता त्यांचा जबाब नोंदवून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे तपास अधिकारी सपोनि़ रमेश सोलापुरे यांनी सांगितले़
यासदंर्भात गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता़ मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही़