तेल्हारा तालुक्यात वीज पडून चौघांचा मृ्त्यू
By Admin | Updated: August 31, 2014 00:00 IST2014-08-30T23:59:52+5:302014-08-31T00:00:10+5:30
तेल्हारा तालुक्यातील निंबोरा व पाथर्डी शिवारात वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू.

तेल्हारा तालुक्यात वीज पडून चौघांचा मृ्त्यू
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील लामकाणी व निंबोरा शिवारात वीज पडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि. ३0 ऑगस्टच्या दुपारी एक वाजता घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर आकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तर पाथर्डी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने दोन संच बंद पडले आहेत.
पोलिस व महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजता पाथर्डी येथील मनोहर वानखडे यांच्या लामकाणी शिवारातील शेतात काही महिला निंदनासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान अचानक पाऊस आल्याने हे मजूर घरी परतत होते. रस्त्याने असतानाच वीज कोसळली. त्यामध्ये ज्योतीताई अरविंद महल्ले (३0) सुनीता संतोष थारकर (३२), स्वाती गोतमारे (१८) या तिघींचा बळी गेला, तर निर्मला बराटे (३३), सुनीता मनोहर वानखडे (३२), रेणुका मनोहर वानखडे (१८), दुर्गाबाई नंदकिशोर भिसे (३५) या गंभीर जखमी झाल्यात. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक तातडीने लामकाणी शिवारात पोहचले. जखमींना आकोट शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदश्रींनी दिलेल्या माहितीनुसार वीज अंगावर पडल्यावर सातही महिला जमिनीवर कोसळल्या. यामध्ये तिघी जागीच मरण पावल्या, तर उर्वरित बेशुद्ध पडल्या. जखमीमध्ये मायलेकीचा समावेश आहे. सदर घटनेने पाथर्डी व निंबोरा गावात शोककळा पसरली आहे. निंबोरा येथील मृतक उत्तम सूर्यभान अडकणे हे पोलिस पाटलाचे वडील आहेत. गुरे-ढोरे चारण्यासाठी ते शेतात गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडली. दरम्यान, तेल्हारा तहसीलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, तेल्हाराचे ठाणेदार शेख अन्वर, आमदार संजय गावंडे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुढील कार्यवाही केली. तीनही मृतक महिलांना उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच तालुक्यातील निंबोरा येथेही उत्तमराव अडकने (५५) हे गुरे-ढोरे बांधण्यासाठी गोठय़ात जात असताना त्यांच्या आंगावर वीज पडून त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.