"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:11 IST2025-07-05T18:10:17+5:302025-07-05T18:11:56+5:30
Eknath Shinde on Uddhav Thackeray Raj Thackeray Vijayi Melava : "उठेगा नाही साला' हा डायलॉग उद्धव ठाकरे यांना शोभून दिसतो"; शिंदे यांचा हल्लाबोल

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
Eknath Shinde on Uddhav Thackeray Raj Thackeray Vijayi Melava : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'गद्दार जय गुजरात म्हणून लागलेत. ते आता झुकलेत, उठेगा नही साला अशी त्यांची अवस्था झालीय...' असे उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावले होते. त्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
'उठेगा नाही साला' हा डायलॉग उद्धव ठाकरे यांना शोभतो...
"तीन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना 'धो डाला'. त्यामुळे 'उठेगा नाही साला' हा डायलॉग उद्धव ठाकरे यांना शोभून दिसतो. तीन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला, अन्यायाविरोधात आवाज उठवला. तेव्हा दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता. त्याने ते आडवे झाले, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 'उठेगा नाही' वगैरे हे त्यांना शोभून दिसते. काही गोष्टी करण्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा दवडून होत नाही. मी एवढेच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. 'झेंडा नाही, अजेंडा नाही' असा काही लोकांनी म्हटलं होतं, पण ते एकानेच पाळले; दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा दाखवला," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
◻️ LIVE | 🗓️ 05-07-2025 📍 ठाणे
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2025
📹 पत्रकारांशी संवाद https://t.co/aCN8kt6veR
आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ...
"मराठी बाबत जर बोलायचं झालं, तर ज्या पंतप्रधान मोदींनी मराठीला अभिमान भाषेच्या दर्जा दिला. त्यांनाही तुम्ही सोडले नाही. त्यांच्यावरही टीका केली. आजचा मेळावा मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसांसाठी फायद्याचा नव्हता. केवळ आगपाखड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती ती दिसून आली. आम्ही काय केलं आणि त्यांनी काय केलं हे स्पष्ट दिसतंय. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला का गेला? मराठी टक्का कमी का झाला? वसई, विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत का गेला? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे," असा सवाल शिंदे यांनी केला.