पर्यावरणस्नेही : सौर उर्जेवर गणेश मंडळाच्या रोषणाईचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:09 IST2017-09-03T19:06:02+5:302017-09-03T19:09:08+5:30
गणेश मंडळांना आरास करताना अलीकडे पर्यावरणस्नेही होण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार ते प्रयत्न करतात. त्यातच उत्सव म्हटले की विजेची जोडणी लागतेच.

पर्यावरणस्नेही : सौर उर्जेवर गणेश मंडळाच्या रोषणाईचा झगमगाट
नाशिक : गणेशोत्सवासाठी पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे देखावे अनेक मंडळे सादर करीत असतात, परंतु विसे मळ्यातील मंथन मित्रमंडळाने देखाव्यासाठी लागणारी विद्युत रोषणाईच सौर ऊर्जेवर चालवून अनोखा आदर्श घालून दिला आहे. अशाप्रकारे थेट सौरऊर्जेचा वापर करणारे बहुधा ते राज्यातील पहिलेच मंडळ ठरले आहे.
गणेश मंडळांना आरास करताना अलीकडे पर्यावरणस्नेही होण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार ते प्रयत्न करतात. त्यातच उत्सव म्हटले की विजेची जोडणी लागतेच. अनेकदा वीजचोरी होते आणि त्यातूनच दुर्घटनाही घडतात. परंतु ते टाळून कॉलेजरोडवरील मंथन मित्रमंडळाने आगळीच कल्पना यंदा मूर्तस्वरूपात आणली. या मंडळाने यंदा काही तरी करण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी एकत्रित चर्चा केली त्यातून यंदा देखाव्यासाठी वीज जोडणी न घेता सौर ऊर्जेचा वापर करण्याचे ठरले. एका कार्यकर्त्याचा सौर ऊर्जेचाच व्यवसाय असल्याने त्यानेही तत्काळ होकार भरला आणि मग एक किलो वॅट वीज निर्माण होईल इतक्या क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल बॉईज टाऊन समोरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बाल्कनीवर ठेवण्यात आले. त्यातून जोडणी घेऊन देखाव्याच्या ठिकाणी असलेले दिवे अन्य दिव्यांच्या माळांना जोडण्यात आल्या.
महावितरणचा सल्लाही वीज कोसळून यंत्रणा खराब होऊ नये याचीही दक्षता घेण्यात आली आणि मूर्तस्वरूप देण्यात आले. एक किलो वॅट वीज निर्मितीतून फोकस लाईट, नियमित लाईट आणि अन्य रोषणाई सुरू आहे. नाशिक शहरात पाऊस झाल्याने काही दिवस अडचणी आल्या. परंतु सूर्यप्रकाश पडला की वीज निर्मिती होऊ लागते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी या देखाव्याची आणि सौर ऊर्जेची पाहणी केली आणि राज्यातील बहुधा पहिलाच प्रयोग असावा, असे मत व्यक्त केले.