आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 22:47 IST2024-12-05T22:41:02+5:302024-12-05T22:47:03+5:30
Eknath Shinde press conference as Deputy CM : मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं, आता मीही मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा देईन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

आधी मी CM होतो, आता DCM म्हणजेच 'डेडिकेटड टू कॉमन मॅन' झालोय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde press conference as Deputy CM : महाराष्ट्रात आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतदार जनतेचे आभार मानले. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्ते दिली. "महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे. या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मी आधी CM होतो, तेव्हा कॉमन मॅन समजत होतो. आता DCM झालो म्हणजेच आता मी डेडीकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आम्ही ४० आमदार होतो. या निवडणुकीत आता ६० झालो. ही कामाची पोहोचपावती आहे. याचा अभिमान आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं. इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईन. मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल अशी भावना व्यक्त करतो."
"मी नाराज नाही. माझी भूमिका आधीच जाहीर केली होती. गेल्या अडीत वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरुन पाठबळ दिले. यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो. अमित शाह यांना ही धन्यवाद देतो. कारण ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून गेल्या अडीच वर्षाचे कार्यकाळ यशस्वी झाला. लोकं म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे. पण जनतेने आमच्या सरकारवर मोहर लावली आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि विकासाला साथ द्यावी," अशी खोचक टीका शिंदे यांनी केली.