तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे खुनी ज्ञानेश्वरचा फास सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:14 IST2019-03-01T06:14:39+5:302019-03-01T06:14:42+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दाखवली दया : माणुसकीची लक्षणे दिसल्याने दिली जन्मठेप

Due to the poems written in prison, Dnyaneshwar was freed! | तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे खुनी ज्ञानेश्वरचा फास सुटला!

तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे खुनी ज्ञानेश्वरचा फास सुटला!

- अजित गोगटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे फाशीऐवजी जन्मठेप ठोठावून ज्ञानेश्वर सुरेश बोरकर या गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने जीवदान दिले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील एका डॉक्टर दाम्पत्याच्या १३ वर्षांच्या मुलाचे पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याबद्दल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.


सासवड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक माईणकर व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी या दाम्पत्याच्या हृषिकेश या मुलाचा खून केल्याबद्दल पुण्याच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आॅगस्ट २००५ मध्ये कायम केली होती. याविरुद्ध ज्ञानेश्वरने केलेले अपील गेली १५ वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. न्या. ए. के. सिक्री, न्या. एस. अबुल नझीर व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ज्ञानेश्वरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप दिली. या शिक्षेत सवलत मिळण्यासाठी तो राज्य सरकारकडे अर्ज करू शकेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ज्ञानेश्वरच्या वतीने ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी खुनाबद्दल दोषी ठरविण्याचा निर्णय मान्य केला. मात्र फाशी का दिले जाऊ नये, एवढेच मुद्दे मांडले. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपा कुलकर्णी यांनी त्याला जराही दया दाखवू नये, असा आग्रह धरला.

डॉक्टरांचे कुटुंब उद््ध्वस्त
डॉ. माईणकर दाम्पत्यास ऋता व हृषिकेश अशी दोन अपत्ये होती. खून झाला तेव्हा हृषिकेश १३, तर ऋता १४ वर्षांची होती. भावाचा खून झाल्याच्या धक्क्यातून ऋता बाहेर आली नाही. सन २००३मध्ये तिने आत्महत्या केली. आता साठीकडे झुकलेल्या डॉ. अशोक विषण्ण मनोवृत्तीत आहेत. डॉ. अश्विनीही हताश आहेत. ज्ञानेश्वरची आई विधवा आहे व तिचा हा मोठा मुलगा आहे, याचा न्यायालयाने विचार केला. पण न्यायालयाच्या या दयाबुद्धीने या डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही अपत्ये गमावण्याच्या कधीही न भरून निघणाऱ्या दु:खावर फुंकर घातली जाईल की डागण्या दिल्या जातील, हे सांगणे कठीण आहे.

फाशी रद्द करताना विचारात घेतलेले मुद्दे
गुन्हा केला तेव्हा ज्ञानेश्वर २२-२३ वर्षांचा होता.
च्त्याने १८ वर्षांचा तुरुंगवास भोगला
च्तुरुंगात त्याची वागणूक चांगली होती. तुरुंगातच तो बीए झाला व त्याने गांधीवादी विचारांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
च्त्याने तुरुंगात केलेल्या कवितांतून त्याला चूक उमगल्याचे दिसून येते.
च्तो सुधारू शकतो व त्याचे पुनर्वसनही होऊ शकते. तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुन्हा वावरू शकतो.
च्तो पुन्हा तसाच गुन्हा करण्याची शक्यता नाही व त्याच्यापासून समाजास धोकाही नाही.

Web Title: Due to the poems written in prison, Dnyaneshwar was freed!