चिपळूण ते वालोपे दरम्यान मालगाडी घसरली;
By Admin | Updated: October 7, 2014 23:40 IST2014-10-07T23:12:23+5:302014-10-07T23:40:44+5:30
अनेक गाड्या रद्द; जीवितहानी नाही; गव्हाची वाहतूक करणारी मालगाडी, उमेदवारही पाहणीसाठी चौथा अपघात

चिपळूण ते वालोपे दरम्यान मालगाडी घसरली;
चिपळूण : चिपळूण ते वालोपे रेल्वे दरम्यानच्या मार्गावर खेर्डी पुलाजवळ आज, मंगळवारी सकाळी ७.५५ च्या दरम्यान रुळ कट झाल्याने चाके निखळून मालगाडीचे ११ डबे घसरले. यातील पाच डबे खाली शेतात कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे कोकणातील अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
आज पहाटे कोकणकन्या व राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरीकडे सुरक्षितपणे गेल्या. मात्र, पावणेआठ ते आठच्या दरम्यान चिपळूणनजीकच्या खेर्डी-माळेवाडी पुलाजवळ रुळ कट झाला होता. त्यानंतर मुंबईहून बंगलोरच्या दिशेने धावणारी मालगाडी येथे आली आणि तिचे ११ डबे घसरले. डब्याची चाके निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या गाडीतून गहू नेला जात होता. सकाळच्यावेळी अचानक रेल्वेचे डबे घसरून खाली आल्याचे अनेकांनी पाहिले आणि बघ्यांची गर्दी झाली. इंजिन काही डब्यांसह पुढे निघून गेले, तर रुळ कट झाल्याने दोन डब्यांमधील जोड तुटला. त्यामुळे हे डबे खाली पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले.
या अपघातामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर कामथे रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती, तर मंगल एक्स्प्रेस सावर्डे रेल्वे स्थानकात उभी होती. या दोन्ही गाड्या परत पाठविण्यात आल्या. या मार्गावरील सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या. काही गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. खेर्डी येथील रेल्वे पुलाचे ग्रील तुटून पडले. ट्रॅकखालील खडी खाली कोसळली. रुळांखालचे सिमेंटचे पोल चिरडून गेले. लोखंडी रुळ वाकडेतिकडे झाले. काही डब्यांची चाके निखळली. कोकण रेल्वेचे अधिकारी व इंजिनिअर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डबे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रुळांची स्थिती पाहता उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कामगार बचावले
रेल्वे टॅकच्या बाजूला खेर्डी पुलाजवळ १० ते १२ कामगारांच्या झोपड्या आहेत; परंतु चार दिवसांपूर्वी ते आपल्या गावी गेल्याने बालंबाल बचावले.
पाच अपघातातील चौथी मालगाडी
गेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे मार्गावरील डबे घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यात करंजाडी येथे दोनवेळा मालगाडी घसरली होती. या दोन घटनांदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथेही मालगाडी रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे पॅसेंजर घसरली होती. या चार घटनांपाठोपाठ आता पाचवी दुर्घटना घडली असून, या पाच अपघातांतील मालगाडी घसरण्याचा हा चौथा प्रकार आहे.
देखभालीच्या दुर्लक्षामुळेच अपघात?
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण-कामथे दरम्यान झालेला मालगाडी अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
अद्याप त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या १५ वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गाच्या रुळांची पूर्णत: देखभाल होणे आवश्यक होते.
कोणत्या ठिकाणी रूळ खचलेले आहेत वा खराब झालेले आहेत याबाबतची माहिती तांत्रिक विभागाकडून प्रशासनाला दिली जाते. मात्र रेल्वे रूळ देखभालीबाबतच्या अनास्थेमुळेच आवश्यक ठिकाणी रुळ वा त्याखालील लाकडी, सिमेंट प्लेटस बदलल्या न गेल्याने व पॅसेंजर गाड्यांच्या तुलनेत मालगाड्यांचे अधिक वजन कमकुवत रुळांना मानवणारे नसल्यानेच रुळ फाकतात व अपघात होतात, असे रेल्वेच्याच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कामगार बचावले
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खेर्डी पुलाजवळ १० ते १२ कामगारांच्या झोपड्या आहेत; परंतु चार दिवसांपूर्वी ते आपल्या गावी गेल्याने बालंबाल बचावले.
पाच अपघातातील
चौथी मालगाडी
गेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे मार्गावरील डबे घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. खेड तालुक्यात करंजाडी येथे दोनवेळा मालगाडी घसरली होती. या दोन घटनांदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथेही मालगाडी रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे पॅसेंजर घसरली होती. या चार घटनांपाठोपाठ आता पाचवी दुर्घटना घडली असून, या पाच अपघातांतील मालगाडी घसरण्याचा हा चौथा प्रकार आहे.